उद्योगांसह गोरगरिबांना आर्थिक पॅकेज देण्याचे अर्थमंत्र्यांचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून वेगवेगळय़ा उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने नजिकच्या काळात अर्थव्यवस्थेत चैतन्य आणण्यासाठी आणखी प्रोत्साहनपर आर्थिक पॅकेज जाहीर करण्याचे संकेत शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी अर्थव्यवस्थेसाठी मोठा दिलासा देत 1 लाख कोटी रुपये जाहीर केले होते. विकासदर खुंटलेल्या अर्थव्यवस्थेत पुन्हा उभारी देण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. कृषी, बँका आणि अन्य महत्वाच्या सेवांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. आरबीआयच्या या निधीपाठोपाठ आता केंद्र सरकारने आणखी काही विशेष उपाययोजना करण्याचेही निश्चित केले आहे. त्यानुसार कोविड-19च्या विळख्यात सापडलेले उद्योग आणि गोरगरिबांना सावरण्यासाठी मोठे प्रोत्साहनपर आर्थिक पॅकेज जाहीर केले जाईल, अशी माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली. जागतिक बँक विकास समितीच्या 101 व्या पूर्ण बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्या या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.
आतापर्यंत विविध क्षेत्रांना सावरण्यासाठी सरकारने 1.70 लाख कोटी रुपये खर्च केलेले आहेत. या निधींतर्गत आरोग्य कर्मचाऱयांना मोफत आरोग्य विमा देण्याबरोबरच जनधन खातेधारकांना अर्थपुरवठा करण्यात आला होता. तसेच अन्नधान्य आणि गॅसचा मोफत पुरवठय़ासाठीही काही रक्कम वापरण्यात आली होती. कोरोनाने प्रभावित मजुरांना सामाजिक सुरक्षा पुरविण्यासाठीही काही निधी राखीव ठेवण्यात आला होता, असे सीतारामन यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केले. गरिबांना मदतीचा हात देण्याबरोबरच लघु आणि मध्यम वर्गातील लोकांसाठी प्राप्तिकर मर्यादा, जीएसटी, सीमाशुल्क, वित्तीय सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने आता नजिकच्या काळात अन्य क्षेत्रांना आधार देण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
अन्य देशांना औषधांची मदत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात औषधांचीही टंचाई जाणवत आहे. तसेच काही ठराविक औषध-गोळय़ांच्या मागणीमध्येही मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सहकारी देशांना औषधे निर्यात करण्याचा झपाटा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताकडे सध्या औषधांचा मुबलक साठा असून अमेरिकेसह अन्य देशांना हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनचा मागणीनुसार योग्य पुरवठा केल्याचेही आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निदर्शनास आणून दिले.