वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत सुरूवातीला कोलकाता शहरामध्ये खेळताना माझ्यावर प्रचंड दडपण येत असे त्यावेळी फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त होण्याचा विचारही आला होता, असे प्रतिपादन भारताचा अव्वल फुटबॉलपटू आणि कर्णधार सुनील छेत्रीने केले आहे.
फुटबॉल क्षेत्रामध्ये कारकीर्द घडविण्यासाठी मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काहीवेळा दडपणामुळे फुटबॉल क्षेत्र सोडून देण्याची कल्पनाही मनाला शिवली होती पण सेनादलात असलेल्या माझ्या वडिलाच्या सहकार्यामुळे मी माझी फुटबॉल कारकीर्द घडवू शकलो, असे छेत्रीने सांगितले. वयाच्या 17 व्या वर्षी सुनील छेत्रीने कोलकात्याच्या बलाढय़ मोहन बागान क्लबशी आपला पहिला व्यावसायिक करार केला होता. त्यानंतर वारंवार माझ्यावर बागान क्लबकडून खेळताना मानसिक दडपण येवू लागले. बायचुंग भुतियानंतर कोलकात्याचे फुटबॉल शौकिन माझ्याकडून अधिक अपेक्षा बाळगत होते पण या प्रसंगावरही मात करून मी फुटबॉल कारकीर्द घडवू शकलो. कोलकातामध्ये फुटबॉल खेळल्याने मला हा खेळ लवकर आत्मसात करता आला, असेही छेत्रीने म्हटले आहे. 35 वर्षीय छेत्रीने आपल्या फुटबॉल कारकीर्दीत आतापर्यंत 70 गोल नोंदविले आहेत.