वार्ताहर/ किणये
टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात कणबर्गी येथील पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात झाला. शनिवारी या पारायण सोहळय़ाची महाप्रसादाने सांगता झाली. तीन दिवस झालेल्या भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रमांमुळे गाव विठ्ठलमय बनले होते. यंदाचा हा रौप्यमहोत्सवी पारायण सोहळा असल्यामुळे गावकऱयांमध्ये उत्साह दिसून आला.
गुरुवार दि. 18 रोजीपासून पारायण सोहळय़ाला सुरुवात झाली. मंडपाचे उद्घाटन हिंडाल्को कंपनीचे विश्वास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडीचे उद्घाटन बसवाणी भंटरगाळी यांनी केले. ध्वजारोहण मारुती सिद्धाप्पा मुचंडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. भैरगौडा पाटील, मुरगेंद्र पाटील, बसवराज यळ्ळूरकर, बाहुबली वीरगौडर, चंद्राप्पा चौगला, मनोहर मुतगेकर, नारायण पाटील, राजू कंग्राळकर, परशराम सुंठकर, मारुती पाटील, बाबू कोनुचे आदींच्या हस्ते विविध देवदेवतांचे पूजन करून पारायण सोहळय़ाला सुरुवात झाली.
या पारायण सोहळय़ात रोज पहाटे काकड आरती, त्यानंतर नित्यपूजा, ध्वजवंदन, ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन, गाथा भजन, दुपारी महिला भजन, हरिपाठ, सायंकाळी प्रवचन व रात्री कीर्तन-निरुपण व जागर भजन असे दैनंदिन कार्यक्रम झाले. गुरुवारी तुरमुरी येथील बाळू भक्तीकर यांचे प्रवचन झाले. उत्तूर, ता. आजरा येथील हभप डॉ. शिवाजी पन्हाळकर यांचे कीर्तन-निरुपण झाले.
शुक्रवारी कोगनोळी येथील हभप पूर्णानंद काजवे महाराज यांचे प्रवचन व कीर्तन झाले. शनिवारी सकाळीही काजवे महाराज यांचे कालाकीर्तन झाले. कालाकीर्तन झाल्यानंतर ‘बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असे म्हणत मंडपाभोवती दिंडी प्रदक्षिणा झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.