‘अम्मा’च्या मृत्यूसाठी द्रमुक जबाबदार असल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ चेन्नई
2016 मध्ये झालेला जयललिता यांचा रहस्यमय मृत्यू तामिळनाडूच्या निवडणुकांमध्ये पुन्हा मुद्दा ठरू लागला आहे. सत्तेत आल्यावर एका वर्षाच्या आत मृत्यूचे रहस्य उलगडणार असल्याचे आश्वासन द्रमुक सातत्याने देत आहे. तर मुख्यमंत्री ई. पलानिसामी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान द्रमुकला जयललितांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत नवा वाद निर्माण केला आहे.
याचमुळे द्रमुक अध्यक्ष के. स्टॅलिन यांनी प्रत्युत्तर देत पलानिसामी यांना स्वतःविरोधात खटला दाखल करण्याचे आव्हान दिले आहे. याचदरम्यान मृत्यूच्या चौकशीसाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांकडून स्थापन चौकशी आयोगाचा कार्यकाळ दहाव्यांदा वाढविण्यात आला आहे. 2017 मध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील आयोगाला 3 महिन्यांत अहवाल सादर करायचा होता.
स्टॅलिन आता प्रचारसभांमध्ये जयललितांच्या मृत्यूचे सत्य दडपल्याचा आरोप मुख्यमंत्री पलानिसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्यावर करत आहेत. याचबरोबर चौकशीचे आश्वासन देत सत्तारुढ पक्षाकडे संशयाच्या नजरेने पाहणाऱया मतदारांना स्वतःकडे आकर्षित करत आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील आयोग मृत्यूचे सत्य दडपत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सप्टेंबर 2016 मध्ये डिहायड्रेशनच्या समस्येमुळे जयललितांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू 5 डिसेंबर रोजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यामुळे झाला होता. पण तत्पूर्वी त्याच संध्याकाळी प्रकृतीत सुधारणा होत असल्याची आणि लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. अण्णाद्रमुकने जयललितांच्या मृत्यूनंतर धक्क्यातून किंवा आत्महत्यांमुळे 400 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मृतांच्या कुटुंबीयांना 3 लाख रुपयांची भरपाईही देण्यात आली होती. पण केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी मृतांचा आकडा 50 च्या नजीक असल्याचे म्हटले होते.
दिग्गजांना परत घालविले
जयललिता 75 दिवस रुग्णालयात दाखल होत्या. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली, अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, किरण बेदी यांच्यासह अनेक नेते त्यांना भेटण्यासाठी गेले होते. या सर्वांना अपोलो हॉस्पिटलच्या अध्यक्षांच्या खोलीत केवळ शशिकला आणि डॉक्टरांनीच माहिती दिली होती. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या विधानामुळे जयललितांच्या मृत्यूसंबंधी संशय निर्माण झाला होता.