प्रतिनिधी / जयसिंगपूर
धरणक्षेत्र परिसर आणि इतरत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग काही अंशी कमी जरी झाला असला तरीसुद्धा महापुराचे संकट अद्याप टळलेले नाही. येणारे आणखी दोन दिवस महत्त्वाचे असून नदीपात्रातील पाणी धीम्या गतीने जरी वाढत असले तरीही ही बाब काळजी करण्यासारखी आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता आणखी दोन दिवस सतर्क रहावे व संभाव्य पूर परिस्थितीला न घाबरता धैर्याने सामोरे जावे. राज्य शासन तसेच जिल्हा व तालुका प्रशासन संकटाच्या या काळी आपल्या सोबत आहे. आणखी दोन दिवस आपण सर्वांनीच काळजी घेऊया सर्वांनी सतर्क रहा असे आवहान सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
शनिवारी सकाळपासून त्यांनी शिरोळ तालुक्यातील नदी काठांवरील अनेक गावांना भेटी देत नागरिक. शासकीय अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांच्याशी पूरस्थिती बाबत सविस्तर चर्चा केली. त्याच बरोबर अलमट्टी धरणामधून होणाऱ्या विसर्गाबाबत कर्नाटक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी अलमट्टी मधून होणाऱ्या विसर्गा बाबत सातत्याने माहिती घेतली.
राज्यमंत्री यड्रावकर यांनी आज चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसुर, शिरटी, शिरोळ, उमळवाड,कोथळी आणि उदगांव या गावांचा दौरा केला आणि पूरस्थितीचा आढावा घेतला, राज्यमंत्री यड्रावकर यांनी शुक्रवारी माध्यमांना माहिती देताना शनिवारी सकाळपर्यंत मदत कार्यासाठी लष्कराचे जवान शिरोळ मध्ये दाखल होतील असे सांगितले होते, शनिवारी सकाळी लष्कराचे 65 जवान रेस्क्यूसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक सामग्रीसह कुरुंदवाड शहरात दाखल झाले, त्याचबरोबर नदीपलीकडील सात गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या बसेस आलास येथे दाखल झाल्या आणि प्रत्यक्ष मदतकार्याला सुरुवात झाली, शुक्रवारी रात्रीपासून पाऊस ओसरल्यामुळे वातावरण काही अंशी दिलासादायक वाटत आहे.
त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पूरपरीस्थिती काही प्रमाणात सावरत आहे. तरीही शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत अंशतः बाधीत झालेल्या गावांमधील ४२७१९ नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले असून या गावांमधील १७९०९ जनावरांना या गावांमधून बाहेर काढले गेले असल्याची माहिती शिरोळ तालुका प्रशासनाने दिली आहे. दत्तवाड, नांदणी, शिरढोण, नृरसिंहवाडी, कुरुंदवाड, शिरोळ जयसिंगपूर या सर्कल मधील ३९ गावातील लोक संभाव्य पूरस्थितीचा धोका ओळखून बाहेर पडलेले आहेत.