ऑनलाईन टीम /मुंबई
“भारत हा असा देश आहे जिथे गायी विद्यार्थ्यांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. तुम्ही हिंसेचा वापर करुन लोकांना दडपून ठेऊ शकत नाही,” असा इशाराच अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाने सरकारी यंत्रणांना दिला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तिने ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष यांच्याबरोबर २० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
याच प्रकरणावरुन ट्विंकल खन्नाने एका वृत्तपत्राचा फोटो ट्विट करत निषेध व्यक्त करण्याबरोबरच सरकारी यंत्रणांना इशाराही दिला आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक वृत्तपत्र दिसत आहे. या वृत्तपत्रामध्ये जेएनयूमधील हल्ल्याची बातमी आहे. यात लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोर दिसत असून बातमीचा मथळा, “ते इथेच आहेत काल एएमयू, आज जेएनयू आणि उद्या यू (तुम्ही)” असा आहे. याच पहिल्या पानाचा फोटो शेअर करत ट्विंकलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.