ऑनलाईन टीम
पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत एका खासगी विमानाने दिल्लीला गेले होते. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाच्या एका नेत्याने यावरुन टीका केली होती. या टीकेवर मुख्यमंत्री चन्नी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“एक गरीब माणूस जर विमानाने कुठे जातोय, तर त्यात काय अडचण आहे,” असं चन्नी म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या विमानप्रवासाचा खर्च सरकारी तिजोरीतून होणार की, ते स्वतः करणार याबद्दल त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
शिरोमणी अकाली दलाच्या एका नेत्याने त्यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की सामान्य माणूस खासगी विमानाने प्रवास करत नाही. काँग्रेस आपल्या राजेशाही सवयी सोडू शकत नाही, असं म्हणत अकाली दल आणि आम आदमी पक्षानेही टीका केली होती. अकाली दलाने म्हटलं होतं, की आम्ही सामान्य माणसाच्या पाठीशी उभे आहोत. परंतु कॉंग्रेसचे नेते चंदीगड ते दिल्लीपर्यंत केवळ २५० किलोमीटरच्या प्रवासासाठी खासगी विमानांचा वापर करतात. तिथे सामान्य फ्लाइट किंवा कार देखील वापरली जाऊ शकते, असं अकाली दलाने म्हटलं होतं.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनीही काँग्रेस नेत्यांच्या खासगी विमानाने प्रवासावर टीका केली होती.