प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस, द्रमुक, आप आणि डाव्या पक्षातील नेत्यांनी हिंडेनबर्ग अहवालाच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या दिल्ली कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर ते दुपारी संसदेत परतले. आदानी कंपनीने कॉर्पोरेट जगतात फसवणूक, राजकीय भ्रष्टाचार, स्टॉकच्या किंमतीत फेरफार केल्याचा आरोप विरोधकांनी हिंडनबर्ग अहवालाचा हवाला देउन म्हटले आहे.
यावेळी विरोधी पक्षाच्या मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारण मोठ्या मेळाव्यावर बंदी घालण्याचे आदेश लागू केल्यामुळे दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. तसेच राजकीय नेत्यांना थांबण्याचे आवाहन करण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला.
मोर्चातील सहभागी विरोधी पक्षनेते आणि दिल्ली पोलिस यांच्यातील तणावानंतर, काँग्रेसचे सय्यद नसीर हुसैन यांनी प्रतिक्रिया दिली. “…आम्ही संसदेत परत जाऊन हा मुद्दा पुन्हा उपस्थित करू. आमचे 17-18 पक्षांचे शिष्टमंडळ ईडीला भेटणार आहे. तसेच ईडीने तक्रार दाखल केली नाही तर ते उघडकीस आणले जाईल. मग आम्ही ती तक्रार तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि संसदेत या विषयी आवाज उठवू.”