नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
दक्षिण आशियातील सर्वात सुरक्षित तिहार तुरुंगात कैद निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना फासावर लटकविण्याची तयारी सुरू आहे. क्यूरेटिव्ह पीटिशन आाि राष्ट्रपतींकडील दयायाचिका फेटाळण्यात आल्यावर या चारही गुन्हेगारांसमोर कुठलाच पर्याय शिल्लक राहणार नाही. दोन्ही ठिकाणच्या याचिका फेटाळण्यात आल्यावर सर्व चार गुन्हेगारांना तिहार तुरुंगात एकाचवेळी फासावर लटकविण्याची तयारी पूर्ण झाल्याचे समजते.
तिहार तुरुंगात एकाचवेळी 4 जणांना फासावर लटकविण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. यापूर्वी 1982 मध्ये रंगा-बिल्लाला एकाचवेळी फाशी देण्यात आली होती. दोघांनाही एकाच फाशीस्तंभावर लटकविण्यात आले होते.
तिहार तुरुंग प्रशासनाने चारही गुन्हेगार विनय, मुकेश, पवन आणि अक्षयला एकाचवेळी फाशी देण्यासाठी आवश्यक फाशीस्तंभ तयार केला आहे. तुरुंगात यापूर्वी दोन जणांनाच फाशी देण्याची व्यवस्था होती. पण तुरुंग प्रशासनाने फाशीस्तंभाची लांबी वाढविली आहे. तिहारच्या तुरुंग क्रमांक 3 मध्ये हा फाशीस्तंभ तयार करण्यात आला आहे. तुरुंगात फासावर लटकविण्यासाठी त्याखाली पुरेशा प्रमाणात जागा असावी लागते. मोकळय़ा जागेतूनच मृतदेह खाली उतरविला जातो. यामुळे खोल खड्डय़ासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली आहे.
क्यूरेटिव्ह पीटिशन
सुटी समाप्त झाल्यावर सर्वोच्च न्यायालयात चारही गुन्हेगारांना क्यूरेटिव्ह पीटिशन सादर करावी लागणार आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने अक्षय या गुन्हेगाराची पुनर्विचार याचिका फेटाळून लावत तीन आठवडय़ांमध्ये क्यूरेटिव्ह याचिका दाखल करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात दोषींची क्यूरेटिव्ह पीटिशन दाखल होऊ शकते.
क्रौर्यपूर्ण दुष्कृत्य
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत धावत्या बसमध्ये चारही गुन्हेगारांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला होता. दिल्लीतील या क्रौर्यपूर्ण दुष्कृत्याने देशासह जगभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी जलदगती न्यायालय, कनिष्ठ न्यायालय तसेच दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून चारही गुन्हेगारांचा मृत्युदंड कायम ठेवण्यात आला आहे.