आम आदमी आक्रमक, मिरजेचे महत्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप
प्रतिनिधी/मिरज
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासन अधिकारी व लोकप्रतिनिधी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत बुधवारी आम आदमी पक्षाच्या वतीने लोकप्रतिनिधींचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालक मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade), नगरसेवक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मिरज शहराचे महत्व कमी करण्याचा घाट घातला जात असून, या विरोधात आम आदमी पक्ष रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशारा देण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री या रस्त्यावरून जात नसल्याने त्यांना त्याचे गांभीर्य नाही. लोक अपघातांमुळे मरत आहेत. आणखी बळी घेतल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल आंदोलनकर्त्यानी केला. मिरज शहरातील सर्व रस्त्यांचे स्टिंग ऑपरेशन करून भ्रष्टाचाराचा भांडाफोड करू, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी रस्त्यावरून हरविल्यामुळे वादावादीचा प्रकार घडला.