राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर आज महाविकास आघाडीची बैठक झाली असून या राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणुनच लढणार असल्याचे ठरले आहे. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना- ठाकरे गट यांचे एकमत झाल्याचे बैठकीनंतर मविआच्या नेत्यांनी बैठकिनंतर सांगितले. या बैठकीत महाविकास आघाडीच्या आगामी वाटचाली खलबते झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, “कर्नाटकमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला बैठकीत या निकालाचे विश्लेषण करण्यात आले. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत चर्चा करण्यात येऊन त्यांनंतरच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. उन्हाच्या तडाख्यामुळे थांबवलेली मविआची वज्रमूठ सभा पाउसमान बघून लवकरच सुरू होणार” अशी माहिती राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी दिली.
पुढे बालताना त्यांनी “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवणार असून यातील जागा वाटपावर महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांचे नेते चर्चा करतील. तसेच कर्नाटक प्रमाणे मविआला महाराष्ट्रात यश मिळेल.” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “कर्नाटकच्या जनतेमध्ये भाजप विरोधात रोष होता तो मतपेटीतून व्यक्त झाला. कर्नाटकमधील जनतेने मोदी- शाह यांच्यावरच राग काढला आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार असून पुढील सभा पुण्यात होणार. या वज्रमुठसभेत कर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांचा सत्कार होणार आहे.” असे कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही या पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले, “महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कर्नाटकमध्ये केवळ काँग्रेस पक्ष नव्हे तर देशातील विरोधी पक्ष जिंकला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून महाराष्ट्रात भाजपचा पराभव नक्की आहे. ज्या पद्धतीने कर्नाटकात जिंकलो त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे. महाविकास आघाडीमधील जागा वाटपाची चिंता इतरांनी करू नये” असेही राऊत यांनी म्हटले.