भारतातील विश्वचषक स्पर्धेतील पाकचा सहभाग सरकारच्या मान्यतेवर अवलंबून : सेठी
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी भारतातील एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतील पाकच्या सहभागाविषयी नव्याने संशय निर्माण केला आहे. पाकचा सहभाग सरकारच्या मान्यतेवर अवलंबून आहे, असे सेठी यांनी म्हटले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीसमोर सदर ‘मेगा इव्हेंट’चे वेळापत्रक ठरविण्याच्या बाबतीत अडचण उभी झाली आहे.
पीसीबी प्रमुखांनी ठेवलेल्या प्रस्तावानुसार, आशियाई क्रिकेट मंडळाचे प्रमुख जय शाह यांच्यासह प्रत्येक घटकाने आशिया चषक स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये आयोजित करण्यास सहमती दर्शविलेली आहे. त्यानंतर सेठी यांची ही टिप्पणी आली आहे. भारत वा पाकिस्तानच्या बाबतीत पीसीबी किंवा बीसीसीआय निर्णय घेऊ शकत नाहीत. संबंधित सरकारेच निर्णय घेऊ शकतात, असे सेठी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
आमच्या सरकारने ते ठरवायचे आहे. भारताच्या बाबतीत सुद्धा संघाने कुठे खेळायला जायचे हे त्यांचे सरकार ठरवते. त्यामुळे आम्ही अहमदाबादमध्ये खेळणार का असे विचारण्यात अर्थ नाही. वेळ आल्यावर आधी आम्ही जाणार आहोत की नाही हे ठरवले जाईल. मग आम्ही कुठे जायचे हे सरकार ठरवेल. आमचा निर्णय या दोन महत्त्वाच्या बाबींवर अवलंबून असेल, असे सेठी यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन्ही देशांमधील दीर्घकालीन भौगोलिक-राजकीय तणावामुळे भारतीय संघ पाकिस्तानला पाठवला जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आशिया चषकासाठी ‘हायब्रीड मॉडेल’चा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या पद्धतीनुसार आशिया चषकाच्या वेळापत्रकाला मंजुरी मिळाल्याने पाकिस्तानचा संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासाठी भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मानले जात होते. विश्वचषक स्पर्धेच्या अंतर्गत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
‘आयसीसी’चे सीईओ ज्योफ अॅलार्डिस आणि अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी गेल्या महिन्यात सेठी यांना भेटण्यासाठी कराचीला भेट दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तेव्हा असा निर्णय घेण्यात आला होता की, जर आयोजनाचा हक्क असलेल्या पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धेचे चार सामने आयोजित गेले, तर पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्याच्या बदल्यात कोणत्याही अटी ठेवणार नाही. पण सेठी यांच्या नव्या पवित्र्याने पुन्हा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आम्ही आयसीसीला असेही सांगितले आहे की, जर आमच्या सरकारने सुरक्षेचा विचार करून आम्हाला परवानगी दिली, तर आम्ही भारतात खेळायला येऊ. त्यांनी परवानगी दिली नाही, तर आम्ही भारतात येऊन खेळणार कसे ? तसेच सरकारने जरी आम्हाला परवानगी दिली, तरी आम्हाला ठिकाणे पाहून कुठे खेळायचे ते ठरवावे लागेल. पण ते नंतर येते. सर्वप्रथम सरकारने आम्हाला होकार द्यावा लागेल’, असे सेठी यांनी म्हटले आहे. आशिया चषक स्पर्धा 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान होणार असून पाकिस्तान आणि श्रीलंका येथे अनुक्रमे चार आणि नऊ सामने होणार आहेत.