पुणे / प्रतिनिधी :
येत्या महाराष्ट्रदिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून द्यावा, या मागणीसाठी मराठीप्रेमी पुन्हा एकवटले आहेत. ज्येष्ठ नाटककार आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री जी. किशन रेड्डी यांना पत्र पाठविले आहे.
अभिजात मराठी भाषा आणि बोली भाषा संवर्धन समितीच्या वतीने हे पत्र पाठविण्यात आले असून, मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयीची आग्रही भूमिका मांडण्यात आली आहे. मराठी साहित्यिकांसह मराठी कलाकार, प्रकाशकांचाही यामध्ये सहभाग आहे.
हा अक्षम्य विलंब का?
मराठीला अभिजात मराठी भाषा असा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारने 2014 साली केंद्र सरकारकडे मागणी केली. त्यानंतर गेली 8-9 वर्ष सातत्याने ही मागणी महाराष्ट्र सरकार करीत आहे. अभिजात भाषेसंबंधीचे सर्व दस्तावेज सादर केलेले असताना हा अक्षम्य विलंब का? असा सवाल या पत्रात विचारण्यात आला आहे.
दिरंगाईचा निषेध
1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आहे. त्या दिवसाच्या पूर्वसंध्येला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा. अन्यथा, मराठी साहित्यिक-कलावंत-पत्रकार आणि सर्व सामान्य जनता महाराष्ट्र राज्य दिनी 1 मे 2023 रोजी आपल्या छातीवर काळय़ा फिती लाऊन या दिरंगाईचा निषेध ठळकपणे सार्वजनिकरीत्या करतील, असेही पत्रात म्हटले आहे.