तथागत भगवान गौतम बुध्द जयंतीदिनी संदेश
कोल्हापूर / प्रतिनिधी
त्रिसरण पंचशील अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी असून, मानवाने अहिंसेच्या मार्ग स्विकारला पाहिजे, अशी शिकवण यातून दिली आहे. त्यामुळे सुखी जीवनासाठी सर्वांनी त्रिसरण, पंचशीलाचे आचरण केले पाहिजे, असा संदेश भंते संबोधी यांनी दिला.
तथागत भगवान गौतम बुध्द जयंतीनिमित्त शास्त्रीनगर येथील बुध्द गार्डमधील आयोजित धम्मदेसनेत ते बोलत होते. बुध्द मुर्तीला पुष्प अर्पण करून सामुदायिक धम्म वंदना झाली. बौध्द धर्मातील पुरूष-महिलांनी पांढरी कपडे परिधान केली होती. याप्रसंगी आमदार जयश्री जाधव, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कोल्हापूर सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भंते संबोधी म्हणाले, गौतम बुध्दांनी दिलेला मानवतेचा धम्म सर्वांनी पाळला पाहिजे. बुध्दांच्या शिकवणीनुसार माणसाने माणसाशी आपुलकी आणि प्रेमाने वागले पाहिजे. धम्मदेसना झाल्यानंतर अनेक संघटनांनी खीर व अल्पोहाराचे वाटप केले. बौध्द बांधवांसह सर्वच जातीधर्मातील लोकांनी बुध्द मुर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शहरातील सर्वच बुध्द विहारात सामुदायिक धम्मवंदना झाली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, भुपाल शेटे, नियाज खान, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दगडू भास्कर, बुध्द गार्डन संवर्धन विकास संघाचे अध्यक्ष, सुखदेव बुध्दय़ाळकर, रंगराव पांडे, ज्योती डोंगरे, अशोक चंदनशिवे, दयानंद शेडगे, सोमनाथ घोडेराव, बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते.