भोगावती / प्रतिनिधी
शाहूनगर परिते ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने ऊस तोडणी ओढणीची थकीत बिले व कमिशन ताबडतोब द्यावे या मागणीसाठी भोगावती ऊस तोडणी व वाहतूक संघटनेच्या वतीने सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषणाला प्रारंभ केला. त्यामध्ये अनेक वाहनधारक सहभागी झाले आहेत.
सन २०२१/२२ सालच्या ऊसगळीत हंगामातील तीन थकीत बिले व पाच बिलांचा डिझेल फरक व कमिशन बिल अशी एकूण सुमारे १३ लाखाहून अधिक रक्कम अद्यापही दिली नाही.यामध्ये कारखान्याची काही गुंतवणूक नसूनही बिलासाठी मात्र वाहनधारकांच्या गेल्या अडीच महिन्यापासूनच्या मागणीला कारखाना प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे सुमारे ६५० वाहनधारक सुमारे २० ते २५ कोटी रुपयांच्या अँडव्हाँन्स रकमेत अडकून पडले आहेत.
साखळी आंदोलनात वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आर वाय पाटील, माजी अध्यक्ष राजू पाटील, उपाध्यक्ष तानाजी जाधव, सचिव धनाजी कौलवकर, सदस्य माणकू पाटील, प्रदिप पाटील, मारुती पाटील, शशिकांत पाटील, सुमित पाटील, नारायण पाटील, दशरथ पाटील व कृष्णात धनवडे आदी वाहनधारक सहभागी झाले आहेत.
साखळी आंदोलन स्थळी प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, मुख्य शेती अधिकारी शत्रुघ्न पाटील, ऊसविकास अधिकारी साताप्पा चरापले व सहकारी यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.तसेच आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.मात्र आंदोलनाच्या पहिल्या दिवशी संचालक मंडळातील कोणीही इकडे फिरकले नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.