अध्याय सविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा! संतांच्या सभेत नेहमी माणसांचे हित करणाऱया माझ्या कथा चालतात. जे त्या ऐकतात, त्यांचे सगळे पाप नाहीसे होते. कारण सत्संग केवळ अतुलनीय आहे. अशी सत्संगती महाभाग्यवंतांना प्राप्त होते. साधु माझ्या कथाकीर्तिचे गायन करीत भगवद्भावनेनेच वागत असतात. ती कथा अकस्मात जरी कानावर पडली तरी तत्काल कलियुगासंबंधीचे पातक धुऊन काढते. कारण ती गंगेहूनही पवित्र आहे. जेथे माझी निजकथा गायन करतात, तेथील तीर्थेसुद्धा पवित्र होऊन जातात. साधू अशा तऱहेच्या भगवंताच्या कथा-कीर्ति सदासर्वदा गर्जून सांगत असतात. सहज जरी संतांकडे गेले तरी प्राण्यांची पातके पळून जातात. अशा त्या संतांच्या मुखातील माझी कथा अत्यादराने श्रोता श्रवण करील, तर त्याचे भाग्य खरोखर मलासुद्धा सांगता येत नाही. माझी कथा किंवा माझे नाम हे साऱया पातकांचे भस्म करून टाकते. राखुंडीसुद्धा शिल्लक ठेवत नाही. उद्धवा! चित्तशुद्धीचे अत्यंत सुगम वर्म ते हेच आहे. अनेक प्रकारचे योगायोग किंवा वेदाध्ययन केले तरी मन पवित्र होत नाही. तीच हरिकथा श्रवण केली असता अंतःकरण पवित्र होते. चुकीच्या पद्धतीने वेद पठण केले तर अनेक प्रकारच्या दोषांची बाधा होते परंतु नाम जरी अशुद्ध म्हटले तरी म्हणणारे परमार्थतः शुद्धच होतात. अनेक प्रकारचे योग, याग किंवा वेदाध्ययन ह्याचे अधिकारी फक्त ब्राह्मणच असतात, परंतु उद्धवा! कथेच्या श्रवणाने चारही वर्ण पावन होतात. आता कथाश्रवणापासून जर इतका लाभ आहे, तर ती सारे लोक का ऐकत नाहीत असे कोणी म्हणतील, तर भगवत्कृपेशिवाय तेवढे भाग्य कोणालाच प्राप्त होत नाही. ज्यांच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झालेली असते, त्याचेच कथाकीर्तनावर प्रेम असते. तेच भाग्याने श्रे÷ होत. माझे नाम व कीर्ति जगाला पवित्र करून सोडते, असे कळवळून श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितले. त्यावर अशी भगवत्कृपाप्राप्ती आपल्या हाती कशी येणार?असा प्रश्न भक्ताला पडणं सहाजिक आहे. त्याच्या उत्तरादाखल भगवंत म्हणाले, जे लोक आदराने आणि श्रद्धेने माझ्या कथांचे श्रवण, गायन आणि कौतुक करतात, तसेच जे माझेच चिंतन करतात, त्यातूनच ते माझी भक्ती प्राप्त करून घेतात. समजा कोणी घरच्या कामासाठी जात असताना सहजासहजी व प्रसंगानुसार हरिकथा कानावर पडली तरी त्या कृष्णकीर्तीच्या कथेची अक्षरे कर्णद्वारात शिरताच आत असलेली झाडून सारी पातके खडबडून बाहेर पडतात. सिंहाची गर्जना कानावर येताच मदोन्मत्त हत्तीची जशी रेवडी उडते, त्याप्रमाणे हरिकथा कानी पडताच महापातकांची राख होऊन जाते. असा पातकाचा केर निघून गेला की, हरिकथेवर अत्यंत भक्ती जडते आणि कथाश्रवणाकडे लक्ष दिले म्हणजे मनही हर्षाने भरून जाते. कथेतील रहस्य जो जो समजावयास लागते तो तो तिच्याविषयी प्रेम वाढत जाते आणि त्या प्रेमाच्या भरात आवडीने ती कथा तो स्वतःच सांगू लागतो. हरिकथेतील रहस्य म्हणजे भगवंतानी भक्तावर त्याच्या प्रारब्धानुसार ओढवलेल्या अडचणी कशा दूर केल्या, त्यांची संकटे कशी निवारण झाली. भगवंतानी भक्त भजनात गुंग झाल्यावर त्यांची कामे कशी केली इत्यादि गोष्टींचा समावेश होतो. असे भक्त बाहेरून फार साधेसुधे दिसत असल्याने ते नेहमीच लोकांच्या चेष्टेचा विषय होतात. त्यांची लोक यथेच्छ टिंगल टवाळीही करत असतात. लोक टिंगल करू लागले की, सामान्य मनुष्य लोकात मिसळायला बिचकू लागतो परंतु हरीभक्त अशा लोकांच्या चेष्टेला बिलकुल भिक घालत नाहीत. लोक काय म्हणतील, नावे ठेवतील का, इत्यादि गोष्टींना दाद न देता ते खुल्या मनाने हरीचे गुणानुवाद गाऊ लागतात. ईश्वराखेरीज त्यांचे मन कशातही गुंतले नसल्याने त्यांना इतर कोणत्याही इच्छा, वासना होत नसतात. माणसाला होत असलेल्या अनेक इच्छा, वासनांमुळे त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याच्या शरीराच्या हलचाली होत असतात परंतु भक्त निरिच्छ असल्याने त्याच्या हातून पूर्व प्रारब्धानुसार आवश्यक तेव्हढय़ाच हालचाली आपोआपच होत असतात. त्यामुळे त्याला आपल्या कर्माचे भान रहात नाही पण भगवंतानी त्यांची सर्व जबाबदारी घेतलेली असते हे आपल्याला त्याच्या अडी अडचणी निवारण झाल्याने लक्षात येते.
क्रमशः