सातारा प्रतिनिधी
शाहूपुरी ते कोंडवे रस्त्यावर असलेल्या दिव्यनगरीमध्ये दिव्यनगरी ते कोंडवे दरम्यान असलेल्या रस्त्यावरील तलावात युवक व युवतीने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना दुपारी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दुपारी ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी सातारा तालुका पालीस ठाण्यात ही माहिती कळवली. सातारा तालुका पोलीस घटनास्थळी हजर झाले असून रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पावसामुळे अडथळा येत असून त्यांना मदत करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सचे सदस्यही हजर झाले आहेत. दरम्यान, या युवकांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नव्हते.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, दिव्यनगरी ते कोंडवे रस्त्यावर असलेल्या गणेश विसर्जन तलावात दुपारी दोघांचे मृतदेह काही नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळवल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावले. तिथे या तलावात अक्षय जोतिराम पवार (वय 26) व गौरी विजय चव्हाण (वय 23) या युवक व युवतींनी आत्महत्या केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तलावात पाणी असून मृतदेह गाळात अडकले असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. तसेच पावसाची रिपरिपही सुरु असून रात्रीच्या अंधारात हे मृतदेह शोधण्याचे काम शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स व पोलिसांकडून सुरु होते. मात्र रात्री उशिरापर्यत त्यात यश आले नाही.
सोमवारी सकाळी दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.पोलीस उपनिरीक्षक दळवी तसेच संजय देशमाने, कुमठेकर, निकम, पवार, वायदंडे हे पडत्या पावसात पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत तिथे शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अंधार पावसाची रिपरिप सुरु असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. दरम्यान, या घटनेमुळे दिव्यनगरी परिसरात खळबळ उडाली असून युवक व युवतीने तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरु होती.