पहिली फेरी असफल, आता दुसऱ्या फेरीकडे लक्ष
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विरोधी पक्षांच्या आघाडीत पुन्हा संकटाची चाहूल निर्माण झाली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरुन नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून त्यांच्या वाटपासाठी या दोन पक्षांची बैठक बुधवारी बिहारची राजधानी पाटणा येथे आयोजित करण्यात आली होती. ती असफल ठरली आहे.
सितामढी, मधेपुरा, गोपालगंज, सिवान आणि भागलपूर या लोकसभा मतदारसंघांसंबंधी मतभेद निर्माण झाले असून ते चर्चेच्या अनेक अनधिकृत फेऱ्यांनंतरही सुटलेले नाहीत. लालूप्रसाद यादव या मतदारसंघांमध्ये आपल्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाचे उमेदवार उभे करण्यासंबंधात आग्रही आहेत. मात्र, संयुक्त जनता दलाने या मागणीला ठाम नकार दिला आहे.
नितीश कुमारांची ताठर भूमिका
2019 च्या लोकसभा निवडणुकीत संजदने भाजपशी युती केली होती. त्यावेळी संजदने 16 जागांवर विजय मिळविला होता. या सर्व जागा यावेळीही आपल्या पक्षालाच जागावाटपात मिळाल्या पाहिजेत, अशी ताठर भूमिका मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत राजदला एकही जागा मिळाली नव्हती. भाजपला 17, लोकजनशक्ती पक्षाच्या दोन्ही गटांना मिळून 6 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. यावेळी राजदला मोठ्या प्रमाणात जागा दिल्यास काँग्रेसला अगदीच कमी जागांवर लढण्याची संधी मिळणार असून तो पक्ष यासाठी तयार होईल का, हा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही, अशी माहिती देण्यात आली.
प्रारंभिक ठराव
मुंबई येथे विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक झाल्यानंतर बिहारमधील जागावाटपावर नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांची चर्चा झाली होती. त्यावेळी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 16 जागा लढवाव्यात आणि इतर आठ जागा मित्रपक्षांना सोडाव्यात असे प्रथमत: ठरले होते. तथापि, आता कोणत्या जागा कोणी लढवाव्यात यावर संघर्ष होत आहे. त्यामुळे समझोता टळला आहे.
यापुढची चर्चा केव्हा…
दोन्ही नेत्यांची यापुढची चर्चा केव्हा होणार हे अद्याप निश्चित नाही. गेल्यावेळी राष्ट्रीय जनता दलाला एकही जागा न मिळाल्याने या पक्षाला आता मोठ्या संख्येने जागा कशा द्यायच्या हा प्रश्न नितीशकुमारांसमोर आहे. शिवाय काँग्रेस आणि डाव्या पक्षांनाही काही जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे संजदच्या सध्याच्या खासदारांना त्यांचा जागा आघाडीतील अन्य पक्षांसाठी मोकळ्या करुन द्याव्या लागणार अशी शक्यता आहे. यावरच जागावाटपाचे घोडे अडले असून यासंबंधी लवकर निर्णय घ्यावा, असा दबाव आघाडीतील अन्य पक्षांकडून येत आहे.
अन्य राज्यांमध्येही समस्या
केरळ, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांमध्येही आघाडीत जागावाटपासंबंधी समस्या आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, झारखंड, तेलंगणा इत्यादी राज्यांमधील जागावाटपाचा प्रश्न अद्याप चर्चेला आलेला नाही. मुंबईतील बैठकीत ही चर्चा होणार होती. तथापि, मतभेदांमुळे ती पुढे ढकलण्यात आली, असे बोलले जाते. जागावाटपाच्या चर्चेऐवजी 14 नेत्यांनी समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून तिची एक अनौपचारिक बैठक झाली आहे. मुख्य समस्या, ज्या राज्यांमध्ये आघाडीतीलच पक्ष परंपरागतरित्या एकमेकांच्या विरोधात लढतात, त्या राज्यांमध्ये असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.