10 दिवस चालणार विधिमंडळ कामकाज : 16 रोजी राज्याचा अर्थसंकल्प
प्रतिनिधी/ बेंगळूर
लोकसभा निवडणूक जवळ आलेली असतानाच सोमवार 12 फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून असल्याने हे अधिवेशन राजकीय वर्चस्वासाठीचे व्यासपीठ ठरणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांमुळे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे 16 फेब्रुवारीला 2024-25 या वर्षातील अर्थसंकल्पही मांडला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे अर्थसंकल्पाकडेही लक्ष लागले आहे.
दुष्काळ व्यवस्थापनात सरकारचे अपयश, गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीतील गोंधळ, विकासकामांसाठी निधीची कमतरता, राज्याची ढासळलेली आर्थिक परिस्थिती, ठेकेदारांकडून कमिशन वसुली, अल्पसंख्याकांना झुकते माप असे अनेक मुद्दे विरोधी पक्षांकडून उपस्थित होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष भाजप आणि निजदने लोकसभा निवडणुकीसाठी युती केली असल्याने दोन्ही पक्ष एकत्र येऊन अधिवेशनात राज्य सरकारवर तुटून पडतील. त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसनेही आपली स्वतंत्र रणनिती तयार केली आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदतनिधी देत नाही.
केंद्र सरकारकडून दक्षिणेतील राज्यांच्या अनुदानात कपात, अनुदान वितरणात भेदभाव या मुद्द्यांवरून भाजपला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने व्यूहरचना केली आहे.
केंद्र सरकारचा सापत्नभाव, कराचा वाटा कमी करणे यासह अन्यायाकडे लक्ष वेधून विरोधकांची तोंडे बंद करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. राज्य काँग्रेस सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. यूपीए सरकार आणि मोदी सरकारच्या अनुदान वितरणाची आकडेवारी मांडून केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेस आणि विरोधी पक्ष राजकीय लाभ उठविण्याचा दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील समस्यांवर कितपत चर्चा होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
राज्यपालांच्या अभिभाषणाकडे लक्ष
राज्यपाल थावरचंद गेलहोत हे सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना संबोधित करतील.
राज्यपालांनी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांना संबोधित करण्याची प्रथा आहे. त्यानुसार या वर्षातील पहिल्या अधिवेशनात राज्यपाल सोमवारी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना उद्देशून भाषण करतील.
सिद्धरामय्या मांडणार विक्रमी 15 वा अर्थसंकल्प
विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अर्थमंत्री या नात्याने 2024-25 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी आतापर्यंत विक्रमी 14 अर्थसंकल्प सादर केले असून 16 फेब्रुवारी रोजी सादर होणारा त्यांचा हा 15 वा अर्थसंकल्प असेल. राज्याच्या इतिहासात एका अर्थमंत्र्याने सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम सिद्धरामय्या यांच्या नावावर आहे. याआधी अर्थमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री दिवंगत रामकृष्ण हेगडे यांनी 13 अर्थसंकल्प सादर केले होते.