सकाळी-सायंकाळी वाहनांच्या रांगा, अवजड वाहनांची सर्रास वाहतूक
प्रतिनिधी /बेळगाव
रहदारीचे नियोजन नसल्यामुळे शहरात सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. कपिलेश्वर उड्डाणपुलावर नेहमीच वाहतुकीच्या केंडीचा सामना वाहनचालक करीत आहेत. अवजड वाहनांची वाढलेली वर्दळ, बेशिस्त पार्किंग व रहदारी व्यवस्थेचा उडालेला बोजवारा यामुळे सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होतेच. परंतु यामुळे वेळ, इंधन वाया जात असून यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
25 डिसेंबर 2016 रोजी कपिलेश्वर उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. उड्डाणपूल अरूंद असल्यामुळे अवजड वाहनांना या उड्डाणपुलावरून निर्बंध घालण्यात आले होते. परंतु सध्या मात्र बिनधोकपणे अवजड वाहने रेटली जात आहेत. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. सायंकाळी 6 ते 7 यावेळेत तर एका बाजूला हेमू कलानी चौक तर दुसऱया बाजूला देशपांडे पेट्रोलपंपपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. ही समस्या रोजचीच असल्याने वाहनचालकही त्रस्त झाले आहेत. वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे रहदारी पोलीसही हतबल झाले आहेत.
सहा वर्षातच उड्डाणपूल खचला
गोगटे सर्कल येथील ब्रिटिशांच्या काळातील दगडी उड्डाणपूल तब्बल शंभर वर्षे मजबूत असल्याचे उदाहरण एका बाजूला असतानाच दुसरीकडे अवघ्या सहा वर्षात कपिलेश्वर उड्डाणपूल खचल्याचे निदर्शनास येत आहे. शनिमंदिर येथील उतारावर हा उड्डाणपूल खचला असून वेगाने येणारी वाहने रस्त्यावर आदळत आहेत. अनेक दुचाकींनाही याठिकाणी अपघात झाला आहे. मागील दोन वर्षांपासून उड्डाणपुलाच्या उताराला खड्डा पडला असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची वाहतूक
कपिलेश्वर उड्डाणपूल हा अरुंद असल्यामुळे अवजड वाहनांना यावरून वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु सध्या भातकांडे स्कूल समोरील रस्त्याचे काम सुरू आहे तर शिवाजी उद्यानपासून जुना धारवाड रोडपर्यंतच्या रस्त्याचे काम उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे अवजड वाहने पाटील गल्लीमार्गे उड्डाणपुलावरून वाहतूक करीत आहेत. परंतु या अवजड वाहनांमुळे उड्डाणपुलाला धोका असून ही धोकादायक वाहतूक तात्काळ थांबविण्याची मागणी प्रवासी व रहिवाशांमधून होत आहे.
रिक्षाचालकांना भाडेही परवडेना
कपिलेश्वर उड्डाणपूल, शनिमंदिर, महाद्वाररोड, पाटील गल्ली, फोर्ट रोड या परिसरात अनेक रिक्षास्टँड आहेत. 1 ते 2 किलोमीटर साठी 40 ते 50 रूपये भाडे देण्यास ग्राहक तयार असतात. परंतु वाहतुक कोंडीमुळे ते भाडे परवडणारे नसल्यामुळे भाडे सोडावे लागत असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालकांनी व्यक्त केली. संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत भाडे असेल आणि वाहतुक कोंडी झाली तर पेट्रोलचा खर्च खिशातून करावा लागत असल्याने भाडे नको रे बाबा म्हणण्याची वेळ रिक्षा चालकांवर आली आहे.