अध्याय चौदावा
योगमार्गाच्या बिकट वाटेचे सविस्तर वर्णन केल्यानंतर भगवंत उद्धवाला भक्तीमार्गाबाबत विवेचन करत आहेत. त्यांच्या मूर्तीचे ध्यान करण्यासाठी त्या मूर्तीचे सांगोपांग वर्णन त्यांनी केले जेणेकरून, त्यानुसार डोळय़ासमोर मूर्ती आणल्यावर भक्ताची समोर स्वतः भगवंत उभे आहेत अशी खात्री व्हावी. कान, नाक, डोळे, हात, चेहरेपट्टी इत्यादींबाबत सांगून झाल्यावर ते पुढे म्हणाले, वीज चमकावी त्याप्रमाणे डोळय़ांना लखलखीत पीतांबर नेसल्यामुळे शोभणारी घनश्याम मूर्ति नजरेसमोर आणावी.
ज्याप्रमाणे आकाशात चांदणे पडले असले म्हणजे खाली नीलवर्ण असून त्यावर शुभ्रवर्णांची झाक मारते, त्याप्रमाणे श्यामवर्ण अंगावर चंदनाची पांढुरकी उटी असल्याने श्रीहरीची शोभा काही अप्रतिम दिसते. मूर्तीच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले आहे. गळय़ात वनमाला शोभून दिसत आहे. पायांमध्ये नूपुरे शोभत आहेत. गळय़ात कौस्तुभमणी झगमगत आहे.
आपापल्या स्थानी चमचमणारे किरीट, कडी कमरपट्टा आणि बाजूबंद शोभून दिसत आहेत. सर्वांगसुंदर असे हे रूप भक्तांचे हृदय हरण करणारे आहे. त्यांची प्रेमपूर्ण नजर कृपाप्रसादाचा वर्षाव करीत आहे. उद्धवा, सर्व अवयवांवर मन स्थिर करीत माझ्या या सुकुमार रूपाचे ध्यान करावे.
बुद्धिमान माणसाने मनाने इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून बाजूला करून त्या मनाला बुद्धिरूप सारथ्याच्या साहाय्याने सर्वतोपरी माझ्या ठिकाणी लावावे. संपूर्ण शरीराला व्यापून राहिलेल्या चित्ताला तेथून ओढून आणून एकेका अवयवावर स्थिर करावे आणि शेवटी अन्य अवयवांचे चिंतन न करता केवळ मंद हास्ययुक्त मुखावर दृष्टी स्थिर करावी.
कदाचित् डोळय़ांचे कटाक्षसुद्धा खुपतील, चंद्रकिरणसुद्धा लागले तर खुपतील, इतक्मया सुकुमार मूर्तीचे ध्यान करावे. ध्यानावर भक्ती बसण्याला मूर्ति कोमल असेल तितकी उत्तम होय. बुद्धीमंत लोक इंद्रियजन्य विषयात अत्यंत लुब्ध असणारे मन, वैराग्याने आवरून, एकनि÷sने माझेच ध्यान लावतात. अशा प्रकारे विषयांना आवरून अखंड माझेच ध्यान केले, म्हणजे आपण स्वतः मत्स्वरूपच होऊन जाऊ या खात्रीने माझे ध्यान करावे. चिंतन करताना मन विचकू लागले तर विचाराने आणि बुद्धीच्या सामर्थ्याने निःशंकपणे माझे स्मरण करू लागले असता धारणेशिवायच ध्यान मनामध्ये ठसते. कारण धारणा जरी तुटून गेली, तरी ध्यानाचा उमटलेला ठसा काही तुटत नाही. मन हे मूर्तीमध्येच राहून मूर्तीच्या सर्वांगामध्ये जडून राहते.
प्रत्येक अंगावर व उपांगावर ध्यानाच्या मिषाने जे चित्त जडून राहिलेले असते, ते सर्व आवरून एकाग्र हास्यवदनावरच निश्चित जडवून ठेवावे. नंतर त्या हास्याचेही ध्यान सोडून देऊन त्या हास्यामध्ये जो घनदाट आनंद भरलेला असतो, त्यामध्ये आपले मन घालावे आणि त्यातच सावधपणाने नि÷ा ठेवावी. त्या आनंदाने आपले मन आनंदयुक्त झाले, म्हणजे साधकांना निश्चयेकरून त्यातच आत्मानंदाची प्राप्ती होईल. जेव्हा चित्त मुखारविंदावर स्थिर होईल, तेव्हा ते तेथून काढून घेऊन आकाशात स्थिर करावे. त्यानंतर आकाशाचे सुद्धा चिंतन करणे सोडून देऊन माझ्या स्वरूपावर आरूढ व्हावे आणि माझ्याखेरीज अन्य कशाचेही चिंतन करू नये. त्या आनंदपदाची प्राप्ती झाली असता जिकडे तिकडे सर्व चिदाकाशच दिसू लागते. त्या चिदाकाशात सावधपणाने आपले चित्त ठेवावे. नंतर चिदाकाश, चित्त आणि चिंतन हे ध्यानातील तिन्ही भेद सोडून देऊन परमानंदाने परिपूर्ण आणि भेदशून्य असा चित्स्वरूपच आत्मा जो मी, त्या माझ्यामध्येच आपली वृत्ती निमग्न करून सोडावी. तेंव्हा चिदाकाशाचे ज्ञान किंवा ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान यांपैकी कशाचेच स्फुरण शिल्लक राहात नाही. जेव्हा अशा प्रकारे चित्त एकाग्र होते,
तेव्हा ज्याप्रमाणे एक ज्योत दुसऱया ज्योतीत मिळून एकरूप होते, त्याचप्रमाणे भक्त स्वतःमध्ये मला आणि मज सर्वात्म्यात स्वतःला पाहू
लागतो.
क्रमशः