कोरोनाकाळात 47 लाख बळी ः अमेरिकन संस्थेचा अहवाल
@ वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
भारतात कोरोनाच्या महामारीने थैमान घातल्यामुळे आतापर्यंत चार लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सरकारच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. तथापि, अमेरिकेच्या रिपोर्टनुसार, हे मृत्यू दहापटीने अधिक असल्याचा दावा होत असल्याने खळबळ निर्माण झाली आहे. कोरोना संसर्गाने भारतावर गंभीर परिणाम केला आहे. भारतात कोरोनाच्या महामारीने 34 ते 47 लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत, जे केंद्र सरकारच्या आकडेवारीपेक्षा दहापट जास्त असल्याचे अमेरिकन संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जगभरात कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत दुसऱया आणि संक्रमित लोकांच्या मृत्यूच्या बाबतीत तिसऱया क्रमांकावर आहे. कोरोनामुळे जगभरात संसर्ग आणि मृत्यूच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. वॉशिंग्टनमधील संशोधन संस्था ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट’ यांनी जाहीर केलेल्या अहवालात सरकारी आकडेवारी, आंतरराष्ट्रीय अंदाज, सेरोलॉजिकल रिपोर्ट्स आणि घरगुती पाहणी याचा आधार घेऊन नवे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.
अमेरिकन अभ्यासाचा हा धक्कादायक अहवाल तयार करणाऱयांमध्ये अरविंद सुब्रमण्यम, अभिषेक आनंद आणि जस्टीन सँडफर यांचा समावेश आहे. अमेरिकेतील संशोधन अहवालानुसार जानेवारी 2020 ते जून 2021 या काळात भारतात कोरोना महामारीने जवळजवळ 50 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.