परवानगीच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने केली अडवणूक : मराठी भाषिकांचा धर्मवीर संभाजी चौकात ठिय्या
प्रतिनिधी /बेळगाव
भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनुसार मराठी भाषेतून परिपत्रके देण्यात यावीत, या मागणीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाची धर्मवीर संभाजी चौकात पोलीस प्रशासनाने अडवणूक केली. त्यामुळे ठिय्या आंदोलन छेडल्यानंतर सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची केंडी झाली. मोर्चासाठी परवानगी दिल्यानंतरच जागा सोडू, असा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने नमते घेत मोर्चासाठी अर्ध्या तासाचा वेळ देत परवानगी दिली.
मराठी भाषिकांची संख्या 15 टक्क्मयांहून अधिक असल्याने मराठी भाषेमधूनही नामफलक लिहावेत तसेच परिपत्रके, योजनांची माहिती व सरकारी कागदपत्रे मराठी भाषेतून देण्यात यावीत, अशी सूचना भाषिक अल्पसंख्याक आयोगाने जिल्हा प्रशासन व महापालिकेला केली होती. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करून भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेला वाटाण्याचा अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे या अन्यायाविरोधात मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. धर्मवीर संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करून मोर्चाला प्रारंभ झाला. मात्र मोर्चाला परवानगी नसल्याचे कारण देत पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावून मराठी भाषिकांची अडवणूक केली. त्यामुळे जमलेल्या नागरिकांनी अन्य रस्त्यांनी जाण्याचा प्रयत्न करताच पोलीसी बळाचा वापर करून मोर्चेकऱयांना जाण्यापासून अडवणूक केली. भारतीय संविधानाने आपल्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार दिला असताना मराठी भाषिकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला.
मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय केला जातो. त्यातच मोर्चाची अडवणूक करून प्रशासनाने अन्यायामध्ये आणखी भर टाकली. त्यामुळे याविरोधात मराठी भाषिक आक्रमक बनले व धर्मवीर संभाजी चौकातच ठिय्या आंदोलन छेडून मोर्चाला परवानगी द्या, अन्यथा हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. याचदरम्यान मराठी भाषिकांचा मोर्चा चिरडून टाकण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पूर्णपणे ताकद लावली होती. धर्मवीर संभाजी चौकात चार रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होती. हा मोर्चा यशस्वी होवू नये, याकरिता अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना धर्मवीर संभाजी चौकात पाचारण करण्यात आले. पण मराठी भाषिकांनी निवेदन देण्यास नकार दिला. शिस्त आणि कोरोना नियमावलीचे पालन करून मोर्चा काढत असताना अडवणूक करण्याचा उद्देश काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. तर जिल्हाधिकारी कार्यालयात येवूनच आम्ही आमच्या समस्या मांडू, अशी भूमिका मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतेमंडळींनी घेतली.
विविध घोषणांमुळे परिसर दणाणला
यावेळी धर्मवीर संभाजी चौकात विविध घोषणांमुळे परिसर दणाणून सोडला. त्याचप्रमाणे मोर्चाची अडवणूक करून चिरडण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. मोर्चासाठी परवानगी देण्यात यावी, असे पत्र जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. तरीदेखील कोणतेच प्रत्युत्तर मिळाले नाही. सातत्याने मराठी भाषिकांवर अन्याय करण्याची भूमिका प्रशासनाने चालविली आहे. त्यामुळे आम्ही माघार घेणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातच जावून आमच्या समस्या मांडणार, अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. या ठिकाणी मराठी भाषिकांची गर्दी वाढल्याने धर्मवीर संभाजी चौकात चारी बाजूनी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले.
सर्वत्र चक्का जाम
तसेच राजेंद्र प्रसाद चौकातून वाहतूक वळविण्यात आली. मात्र सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱया नागरिकांची गर्दी वाढली होती. त्याचप्रमाणे शाळा सुरू झाल्याने पालकांची व विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. त्यामुळे कॉलेज रोडसह वाहतूक वळविण्यात आलेल्या सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. मराठी भाषिकांना धर्मवीर संभाजी चौकातच रोखून धरण्यात आल्याने सर्वत्र चक्का जाम झाला. विविध मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीमुळे कॅम्प परिसरात परिवहन मंडळाच्या बसेस अडकून पडल्या होत्या. प्रशासनाने मराठी भाषिकांची अडवणूक करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. विविध रस्त्यांवर तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने अखेर पोलीस प्रशासनाला व जिल्हा प्रशासनाला नमते घ्यावे लागले. निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोर्चाकरिता परवानगी देण्यात आली. पण परवानगी देताना देखील वेळेचे बंधन घालण्यात आले. अर्ध्या तासात मोर्चा उरकण्याची सूचना करून मोर्चाला परवानगी देण्यात आली.
प्रशासनाच्या आडमुठेपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना
जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या आडमुठेपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. मोर्चेकऱयांना चौकात अडवून धरण्यात आल्याने बाजारपेठेत जाणारे सर्व रस्ते बंद करावे लागले. त्यामुळे वाहनधारकांचे हाल झाले. अवजड वाहनांना ये-जा करण्यास रस्ता नसल्याने वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ आली. जर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यास परवानगी दिली असती तर सर्वसामान्य नागरिकांना कोणताच त्रास झाला नसता. पण प्रशासनाच्या अन्यायी धोरणामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला.
म. ए.समिती कार्यकर्त्यांविरूद्ध एफआयआर
आपल्या न्याय हक्कांसाठी सोमवारी मोर्चा काढणाऱया म. ए. समिती नेते, कार्यकर्त्यांविरूद्ध येथील कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुमारे 200 जणांविरुद्ध संसर्गजन्य रोगराई कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोमवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मवीर संभाजी चौकपासून मोर्चाला सुरूवात झाली. या परिसरात गर्दी करुन कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. उपलब्ध माहितीनुसार भा.दं.वि. 283, 341, 143, 147 सहकलम 149 व 4, 5 (1), 5 (3), कर्नाटक ऍपॅडमीक डिसीज ऍक्ट 2020 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना न्याय मागणीसाठी मोर्चा काढणाऱया मोर्चेकऱयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.