मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार
प्रतिनिधी/ कुडचडे
राज्यात ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमातून भाजप सरकारला कलाटणी मिळाल्यामुळे सध्या विरोधक मन मानेल ते विषय घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे कार्य मुळीच फळाला येणार नाही. हा उपक्रम देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त खास जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राबविण्यात आला असून भारतीय जनता पक्ष स्वार्थाला नव्हे, तर देश, राज्य आणि जनता यांनाच अधिक प्राधान्य देतो, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी कुडचडे येथे बोलताना काढले.
सरकार या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत बहुतेक लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. विविध ठिकाणी आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे अंदाजे पन्नास टक्के लोकांची कामे हातवेगळी झालेली असून काही तांत्रिक समस्या असलेल्या लोकांची कामे लगेच होणार आहेत, असे सावंत यांनी सांगितले. कुडचडे-काकोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेला ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रम मोठय़ा उत्साहात आणि मुख्यमंत्री सावंत, सावर्डेचे आमदार तथा साबांखामंत्री दीपक पाऊसकर, स्थानिक आमदार व वीजमंत्री नीलेश काब्राल, कुडचडे-काकोडा पालिकेचे नगराध्यक्ष विश्वास सावंत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सरकार दरबारी रखडलेल्या कामांचे लोकांनी उपस्थित राहून सोपस्कार पूर्ण केले.
उद्घाटन सोहळय़ात बोलताना सावंत यांनी सांगितले की, सरकार तुमच्या दारी या उपक्रमाचा सर्वांना नक्कीच फायदा होणार. कारण लोकांच्या अडचणी कमीत कमी वेळेत सुटाव्यात यासाठी प्रत्येक खात्यातील अधिकाऱयांना येथे बोलावले आहे. ते सर्वांना सहकार्य करतील तसेच कोणाच्या काही त्रुटी असल्यास त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतील. याचा सर्वांनी फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जनतेच्या सहकार्यातून गोवा स्वयंपूर्ण होणार
स्वयंपूर्ण गोवा बनविण्याचे ध्येय सरकारने वर्षभरापूर्वी जाहीर केले होते व त्यात सरकारला यश येत आहे. गोवा स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोविड महामारीमुळे लोकांना परिस्थितीचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे इतर राज्यांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण बनावे या हेतूने लोक पावले उचलू लागलेले आहेत. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी लोकांच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे व त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेत हा संकल्प पूर्णत्वाकडे नेला पाहिजे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
कोणत्याही अडचणी आल्या, तरी मुख्यमंत्री योजलेले कार्य सफल करण्यात यशस्वी ठरलेले आहेत व यापुढेही त्यांना ते शक्मय होणार यात कोणतीच शंका नाही. आज मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. राज्यात सर्वत्र बांधकाम खात्याची कामे सुरू आहेत व ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत, असे बांधकाममंत्री पाऊसकर यांनी सांगितले. यावेळी राज्यात चाललेल्या कामांची त्यांनी माहिती दिली.
सामान्य जनतेच्या कामांना चालना ः काब्राल
राज्यात सर्वत्र सरकार तुमच्या दारी उपक्रम राबविण्यात आलेला आहे व आता कुडचडेत त्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या राहिलेल्या कामांना चालना मिळणार आहे. लोकांना चांगली सेवा देणे हे सरकारचे काम असून त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा कुडचडेतील लोकांना फायदा होणार, असे वीजमंत्री काब्राल म्हणाले. सुरुवातीला महिला गटातर्फे मुख्यमंत्र्यांना ओवाळण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान कृषी खात्यातर्फे ग्रास कटर यंत्रे देण्यात आली. तसेच महिला गटांना योजनेच्या खाली धनादेश देण्यात आले. यावेळी प्रत्येक सरकारी खात्यातील अधिकारी व कर्मचारी सेवा देण्यासाठी उपस्थित होते.
लोकांकडून टीका
दरम्यान, सरकार तुमच्या दारी उपक्रम राबवून जर निवासाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला एका दिवसात देण्यात येतो, तर पंचायत व नगरपालिका का नाही देत, असा सवाल लोकांनी केला असून यात मुख्यमंत्री सावंत यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या उपक्रमासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना केली आहे. सरकार ऑनलाईन सेवा सुरू केल्याचे जाहीर करते. पण वरचेवर सरकारची वेबसाईट बंद असते. त्यावर उपाययोजना करावी. तसेच मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षण घेत आलेल्या विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी खास लक्ष घालावे, अशी मागणी लोकांकडून करण्यात आली आहे. सरकार तुमच्या दारी हा उपक्रम राबवून सरकार येणाऱया निवडणुकीची तयारी करत आहे की काय, असाही टोला लोकांनी सोशल मीडियातून हाणला.