वारणानगर / प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढायला सुरवात झालेपासून शिक्षणव्यवस्था बंद आहे. यात अंगणवाडीच्या शाळा देखील समावेश आहे. अंगणवाडी शाळांना दैंनदिन शिजवून आहार देणाऱ्या महिला बचत गटांचे काम देखील ठप्प झाले असून, पोषण आहार देणारे गट अडचणीत सापडले असून त्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी बचत गटातून होऊ लागली आहे.
अंगणवाडीत विद्यार्थी येण्याचे थांबवल्यापासून सुमारे सात महिने बचत गटाचे काम बंद आहे. जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी शाळांना हे बचत गट शिजवून पोषण आहार देत होते, गटातील महिलांना काम बंद असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे पर्यायी कामे देखील बचत गटाकडे उपलब्द नाहीत. त्यामुळे अनेक गटातील महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शासन गटामार्फत शिजवून अन्न घेवून रविवार वगळता वर्षभर अंगणवाडीतील बालकांना सकस पोषण आहार गटामार्फत देत होते. यामध्ये शासन गहू व तांदूळ देत होते, ते देखील अलीकडील चार वर्षात दिलेला नाही. प्रतिविद्यार्थी आठ रूपये प्रमाणे शासन या आहाराचे गटांना बील अदा करीत होते. शाळाच बंद ठेवल्याने यातील अंगणवाडी पासून महाविद्यालयापर्यन्त सर्वच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा पगार शासन देत आहे. त्याप्रमाणेच पोषण आहार पुरवठा करणाऱ्या गटांना बंद काळात मदत करावी अशी मागणी होत आहे.