351 बळी गेले तरी मुख्यमंत्री गंभीर नाहीत, गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची टीका
प्रतिनिधी/ पणजी
कोरोनामुळे बळींची संख्या वाढत चालली आहे, पण सरकार याबाबत कुठेच गंभीर दिसत नाही. चार दिवसात 33 बळी गेले असतानाही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना त्याबाबत काहीही पडलेले नाही. कोरोना बळींची संख्या वाढत चालली असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एक शब्द बोलत नाही ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
कोरोना बळींच्या संख्येने साडेतीनशेचा आकडा पार केला आहे. आता दरदिवशी 8 ते 9 बळी जात आहेत. छोटय़ाशा गोव्यात अशा प्रकारे बळी जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, पण मुख्यमंत्र्यांना त्याचे सोयरसुतक नाही. मुख्यमंत्र्यांना चिंता आहे ती जिल्हा पंचायत निवडणुकीची. राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला असताना व बळींची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री शाळा सुरू करण्याच्या गोष्टी करतात. अपरिपक्व लोकांच्या हाती सत्ता गेल्यानंतर काय होऊ शकते याचे हे जिवंत उदाहारण आहे.
कोरोनाने हाहाकार माजविला आहे. राज्यात मृत्यूचे तांडव सुरू आहे, पण मुख्यमंत्र्यांना त्याची चिंता नाही. कोराना खर्चाचा आकडा फुगवून मलई कशी लाटता येईल यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. आरोग्यमंत्री दरदिवशी माध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने चांगले काम चालल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही, असेही ते म्हणाले.
कोरोना घातक स्थितीच्या दिशेने जात आहे आणि अशावेळी अकार्यक्षम लोकांच्या हाती सत्ता आहे ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. गोव्याभरातून लोकांची नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने कोरोनावर व बळींच्या संख्येवर नियंत्रण न आणल्यास लोकांच्या सहनशिलतेचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आतातरी भानावर यावे आणि जबाबदारीने वागावे. कोरोना बळींमुळे कुटुंबे उद्वस्थ होत आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री व सरकार आहे असा आरोपही चोडणकर यांनी केला आहे.