ऑनलाईन टीम / लखनऊ :
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि पक्षाचे नेते आझम खान यांनी आज लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव करहाल मतदारसंघातून तर आझम खान हे रामपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार होता. आज या दोन्ही नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन खासदारकीचा राजीनामा दिला.
अखिलेश यादव आता उत्तर प्रदेशच्या विधानसभेत विरोधीपक्षाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अखिलेश आमदार म्हणून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय राहणार आहेत. अखिलेश हे करहाल मतदारसंघातून भाजपच्या एसपी सिंह बघेल यांचा पराभव करून निवडून आले होते. अखिलेश यांना 1,48,196 मते मिळाली होती. तर एसपी सिंह बघेल यांना 80,692 मते मिळाली होती. तर आझम खान यांनी तुरुंगात असूनही रामपूर विधानसभा मतदारसंघात 55,141 इतक्या मताधिक्मयाने विजय मिळवला होता. त्यांनी भाजपच्या आकाश सक्सेना यांना पराभवाची धूळ चारली होती.
अखिलेश यादव आणि आजम खान यांच्या राजीनाम्यानंतर आता समाजवादी पक्षाच्या खासदारांची संख्या 5 वरुन 3 झाली आहे. दोन्ही जागा रिक्त झाल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा पोटनिवडणूक घेतली जाईल.