प्रतिनिधी/ बेळगाव
एपीएमसी ते कंग्राळी खुर्द रस्ता करावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. या रस्त्यासाठी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी अनेक आंदोलने केली. रास्तारोको, आमरण उपोषण यासह जिल्हाधिकाऱयांवर निवेदनांचा वर्षाव केला तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने कंग्राळी ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त होत आहे.
एपीएमसी ते कंग्राळीखुर्द हा रस्ता म्हणजे अपघाताला आमंत्रण देणाराच रस्ता ठरला होता. दररोज लहान मोठे अपघात या रस्त्यावर घडत होते. स्मार्टसिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हा रस्ता येत होता. त्यामुळे हे दोघेही एकमेकांकडे बोट करत होते. जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी कंग्राळी ग्राम पंचायत अध्यक्ष व सदस्यांसह अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. याचबरोबर त्यांनी रास्तारोको केला होता.
जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले. या रस्त्यावरुन मोठी वर्दळ असल्यामुळे हा रस्ता महत्वाचा आहे, हे प्रशासनाला अनेकवेळा दाखवून दिले. आता कोरोनामुळे सर्व जण संकटात सापडल्यामुळे आंदोलने थांबली होती. मात्र आता जिल्हा प्रशासनाने दखल घेवून या रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने समाधान व्यक्त होत आहे. आता कंत्राटदाराने तातडीने हे काम पूर्ण करावे, कारण लवकरचे पावसाला सुरुवात होण्याची शक्मयता आहे. तेंव्हा पावसाळयापूर्वी काम पूर्ण करुन दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.