ओटवणे/ प्रतिनिधी-
बांदा – दाणोली या जिल्हामार्गादरम्यान सरमळे येथील दाभिल नदीवरील पुलाच्या तोंडावर अडकलेल्या लाकडाबाबत दैनिक तरुण भारतने सार्वजानिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधताच हे ओंडके जेसीबीने दूर करण्यात आले. त्यामुळे या कमी उंचीच्या पुलाने अखेर मोकळा श्वास घेतल्याने या पुलावर वारंवार पाणी येऊन या जिल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका टळला आहे.
या पुलाच्या कमी उंचीमुळे पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेली लाकडे पुलाच्या तोंडावर अडकतात पर्यायाने या पुलावर सातत्याने पाणी येते आणि या जिल्हामार्गावरील वाहतुक ठप्प होते. त्यामुळे याबाबत दैनिक तरूण भारतने सार्वजनिक बाधकाम खात्याचे लक्ष वेधले होते
वाहतुकीच्या दृष्टीने बांदा – दाणोली हा जिल्हा मार्ग महत्त्वाचा आहे. आंबोली आणि गोवा ही दोन्ही पर्यटन स्थळे कमी अंतरात जोडणारा हा मार्ग असून पावसाळ्यात या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच बांदा परिसरातून पुणे, कोल्हापूरसह बेळगाव येथे येण्या-जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे प्रवासासाठी या भागातील बहुतांशी वाहन चालक याच मार्गाचा अवलंब करतात
दरम्यान कमी उंचीच्या आणि पावसाळयात नेहमी टुथडी भरून वाहणाऱ्या या दाभिल नदीवरील या पुलाला संरक्षक कठडा नसल्याने वाहने थेट नदीत कोसळण्याचा धोका आहे. तसेच या पुलाच्या एका बाजूला तीव्र उतार तर दुसऱ्या बाजूला वळण असल्याने या पुलावर अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
सुमारे २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा कमी उंचीचा पूल जीर्ण झाला असुन हा पूल निर्लेखीत करून याठिकाणी नवीन पूल बांधण्याची या भागातील जनतेसह वाहन चालक व प्रवाशांची मागणी आहे. मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नाराजी आहे.