“मराठीत एक म्हण असतंय ना रे, आपल्याला एक लेडीज जबरदस्तीने घेऊन जातंय असं आपण बोलतंय, पण मनातून आपल्याला पण तिच्या मागं जावंसं वाटतंय…’’ नागजंपी ऊर्फ नाग्याने त्याच्या अद्भूत मराठीत सवाल फेकला.
मी काही क्षण मनातल्या मनात डोकं खाजवलं. मग त्याला विचारलं, “अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी या म्हणीबद्दल बोलतोयस का?’’ “यस, तू राईट असतंय. मला जरा शाब्दिक कोटी करायचं होतं. म्हणजे हे नवीन लस येणार असं सरकारी लोक म्हणतंय ना त्याबद्दल की अगं अगं लशी, मला कुठं नेशी.’’
नाग्याच्या कोटीक्रमावर मी आधी हसून घेतलं. मग त्याला विचारलं, “तू कोणत्या सरकारबद्दल बोलतो आहेस? महाराष्ट्र की केंद्र? दोन्हीकडे वेगवेगळी सरकारे आहेत.’’ “दिल्लीत त्याहून वेगळं सरकार असतंय,’’ आज नाग्या फॉर्मात होता.
“बरं, मुद्यावर ये.’’ “माझं मुद्दा इतकंच असतंय की या लशीचं तिसरं फेज का काय असतंय ते झालेलं असतं काय? आणि ते पहिल्यांदा आपण का टोचून घ्यायचं? फॉरेनमध्ये आधी सगळे पुढारी लोक टोचून घेतलं. आपल्याकडे पण आधी पुढारी लोक का नाही टोचून घेत?’’ “कारण त्यांना आपली काळजी आहे. स्वतःला काही होऊ दे, जनतेला कोरोना होऊ नये अशी त्यांची भावना आहे. म्हणजे असेल.’’ “मला ते लस नकोच. त्याचं साईड इफेक्ट झालं तर क्वारंटाईन व्हावं लागतंय का? नाही. पण कोरोना झालं की क्वारंटाईन व्हायला चान्स मिळतंय. पंधरा दिवस बायकोचं कटकट नाय. घरी आल्यावर अजून पंधरा दिवस बायको आपल्याला वेगळय़ा खोलीत ठेवणार. चहापाणी, जेवणखाण आणून देणार? स्वर्ग म्हणजे दुसरं काय असतंय रे?’’
“आणि मेलास तर खरोखरच स्वर्गात जाशील त्याचं काय? अरे कोरोनामुळं माणूस मरू शकतो.’’ “कोरोनामुळं मेलेल्या रुग्णांपेक्षा बरं झालेलं पेशंट जास्त असतंय. मी रोज टीव्हीवर आकडे बघतंय. आणि लस घेतल्यावर मी आयुष्यात कधीच मरणार नाय याचं कोण गॅरंटी दिलंय काय? नाही बॉडीचं भरवसा असं आपल्या संतांनी सांगितलेलं तुझ्या लक्षात नाय?’’
“धन्य आहेस. लहानपणी देवीची लस आली तेव्हा ती आधी हेडमास्तर, वर्गशिक्षकांनी घ्यावी म्हणून ओरडलास की नाही?’’
“मी तेव्हा महिनाभर शाळेला बुट्टी मारलेलं.’’ नाग्याने मला पुराव्यादाखल त्याचे दोन्ही दंड दाखवले. खरोखरच त्याने देवीची लस कधीच टोचून घेतलेली नव्हती!