कित्येक दिवसांपासून रस्त्याचे घोंगडे भिजत
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर ज्या गडाच्या पायथ्याला वसले आहे त्या गडाकडे जाणारा रस्ता अंत्यत खराब झाला आहे. खालची मंगळाई देवी मंदिरापर्यंत कसाबसा रस्ता झाला आहे. तेथून पुढचा रस्ता अतिशय खराब असून टाकलेली खडीही निसटून जावू लागली आहे. पायी चालत जाणेही मुश्किल असून हा रस्ता नेमका कशात अडकला आहे. टेंडरची प्रक्रिया गेले सहा महिने होवू शकली नाही. आता दिवाळीनंतर तरी या रस्त्याचे काम पूर्ण होणार काय असा सवाल सातारकर विचारु लागले आहेत.
किल्ले अजिंक्यताऱयावर जाणारा एकमेव रस्त्यासाठी अनेकदा घोषणा झाल्या. अनेकदा निधी पडल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात आमदार शिवेंद्रराजे यांनी रस्त्याचे काम मंजूर करुन आणल्याचे काही कार्यकर्ते दावा करतात. त्यानुसार या रस्त्याच्या कामामध्येही चालढकल झाल्याचे दिसत आहे. खालची मंगळाई मंदिर म्हणजे स्मृती वनापर्यत रस्ता करण्यात आला आहे. तेथून पुढचा रस्ता उकरुन काढण्यात आला आहे. मुरुम सदृश खडी टाकण्यात आली आहे. काही ठिकाणी सरंक्षक भिंतीचे सुरु असलेले काम मध्येच बंद पडले आहे. अगदी दरवाजापर्यंत अशीच उकरलेली खडी आहे. त्यामुळे दुचाकी सोडाच पायी चालत जाणाऱयांस चालणे मुश्किल बनले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे किल्यावर जाणाऱयांची संख्या कमी झाली असली तरीही लॉकडाऊन जसे शिथील होईल तसे अनावश्यक जाणाऱयांची मांदिआळी वाढेल तेव्हा मात्र अपघातांची संख्या वाढणार आहे. रस्ता कधी होणार नक्की कशात अडकला आहे, असा सवाल सातारकर विचारु लागले आहेत.
मंत्री शंभूराज देसाई यांचे बंधू त्या रस्त्याच्या परिसरात राहतात
मंत्री शंभूराज देसाई यांचे बंधू रविराज देसाई हे शाहुनगर येथे किल्ले अजिंक्यतारा रस्त्यालगत त्यांचे निवासस्थान आहे. त्यांना हा रस्ता का रखडला आहे हे माहिती असावे. हा रस्ता व्हावा यासाठी त्यांनी पाठपुरावा करुन मंत्री शंभूराज देसाइं यांनीही लक्ष घालावे. तसेच नगरपालिकेनेही पालकत्व घ्यावे, रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी केली आहे.