कारभारावरून विजय वडेट्टीवार यांच्यावर होत होते आरोप
मुंबई/प्रतिनिधी
मराठा समाजातील तरुणांच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी गठीत केलेल्या ‘सारथी’ संस्थेसह मराठा समाजाच्या विविध संस्थांची धुरा आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढून सारथीची जबाबदारी नियोजन खात्याकडे वर्ग केली आहे.
सारथी तसेच मराठा समाजाच्या इतर योजनांची जबाबदारी ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे होती. मात्र, ते योग्य काम करत नसल्याचा आरोप होत होता. सारथीच्या कारभारावरून खासदर संभाजीराजे छत्रपती यांनी टीकास्त्र सोडले होते. अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेऊन सारथी आणि मराठा समाजाशी निगडित योजनांची जबाबदारी स्वतःकडे घेणार असल्याचे जाहीर केले होते.
मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाच्या घडामोडी घडत असल्याने राज्य सरकारने शासन आदेश काढून ही जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे सोपविली आहे. अजितदादा हे धडाडीने आणि तात्काळ निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांना या प्रश्नाची पूर्ण माहिती असल्याने मराठा समाजाचे प्रश्न ते तातडीने सोडवू शकतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.