पगारवाढीचा प्रस्ताव तरी माघार नाही
प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटी कर्मचारी पगारात घसघशीत वाढ करून संप मागे घेण्याची विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांनी जरी या संपकरी कर्मचाऱयांना केली. पण या संपामधून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने घसघशीत पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला असला तरीही एसटी कर्मचाऱयांनी माघार न घेण्याचा पवित्रा रत्नागिरीत बुधवारी सायंकाळी दिसून आला.
संपातून तोडगा काढण्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची महत्वाची भूमिका आहे. मंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांची या प्रकरणी विस्तृत चर्चा झाल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका परब यांनी मांडली. गेल्या 14 दिवसांपासून एसटी कामगारांचा संप चालू आहे. राज्य सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. एसटी कर्मचाऱयांचा पगार आता यापुढे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपूर्वी होणार, एसटीचे उत्पन्न वाढलं तर कर्मचाऱयांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार. त्यामुळे कर्मचाऱयांनी संप मागे घ्यावा व कामगारांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे, तत्काळ हजर होणाऱया कामगारांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याची विनंती करण्यात आली आहे. तरीही अजून एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे रत्नागिरीत सायंकाळी दिसून आले.
‘चिपळूण–रत्नागिरी’ला पोलीस बंदोबस्त चिपळूण-रत्नागिरी या एसटी बसला बुधवारी हातखंबा ते रत्नागिरी अशा प्रवासात पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मंगळवारी राजापूर-रत्नागिरी या गाडीलाही मनसेने ‘गांधीगिरी’ करत परत ही गाडी राजापूर आगारात पाठवली. यामुळे बुधवारी चिपळूण-रत्नागिरी या एसटी बसला पोलीस बंदोबस्तात हातखंबा ते रत्नागिरी असा प्रवास करावा लागला.