वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळ सरकारने कठोर अटींसह भारतीय नागरिकांना स्वतःच्या देशात प्रवेशाची सूट दिली आहे. कोरोना महामारीमुळे भारत-नेपाळ सीमा 24 मार्च 2020 पासून बंद होती. भारत सरकारने यापूर्वीच स्वतःच्या सीमेत प्रवेशाची अनुमती दिली आहे.
नेपाळच्या गृह मंत्रालयाने सीमा अटींसह खुली करण्याचा आदेश काढला आहे. याच्या अंतर्गत सीमावर्ती क्षेत्रातील सर्व जिल्हा प्रशासनांना पत्र पाठविण्यात आले आहे. यात भारतीय नागरिकांसह विदेशी नागरिकांना देखील अनुमती देण्यात आली आहे.
विदेशी नागरिकांना नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी 72 तासांपूर्वीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे. नेपाळमध्ये प्रवेशासाठी सरकारच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून अनुमती घ्यावी लागणार आहे. भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये प्रवेश करतेवेळी अनुमतीची प्रत बाळगावी लागेल. पदयात्रा तसेच गिर्यारोहणासाठी येणाऱया पर्यटकांनाही अनुमती घ्यावी लागणार आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विदेशी नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा उपलब्ध होणार आहे. नव्या नियमाच्या अंतर्गत लसीचे दोन्ही डोस घेतल्याच्या 14 दिवसांनीच विदेशी नागरिकांना नेपाळ प्रवेशाची अनुमती असणार आहे.
हवइा& प्रवासासाठी चेक इनवेळी 72 तासांपूर्वी पर्यंतची कोरोना चाचणी देखील अनिवार्य आहे. कोरोनाबाधित आढळल्यास आरोग्य मंत्रालयाकडून निश्चित रुग्णालय आणि आयसोलेशनमध्ये 10 दिवसांपर्यंत रहावे लागणार आहे. दुसऱया चाचणी करत अहवाल निगेटिव्ह आल्यावरच देशात फिरण्याची अनुमती असणार आहे.