रघुवंशातील सारेच राजे प्रजाहितदक्ष आणि पराक्रमी होते. ही परंपरा प्रभू श्रीरामानंतरही चालू राहिली. असो. मागील कथेत उल्लेख केल्याप्रमाणे रघुराजाने कौत्साला गुरुदक्षिणेसाठी सुवर्णमुद्रा दिल्या. त्यामुळे प्रसन्न झालेल्या कौत्साने रघुराजाला आशीर्वाद दिला. त्याच्या आशीर्वादाने रघुला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव ख‘अज’ ठेवले. अजही रूपा गुणाने रघुसारखाच होता. तो मोठा झाला, शिकला. विद्याविनयसंपन्न अज सर्वांचा लाडका होता. विदर्भराज भोजाची धाकटी कन्या इंदुमती. इंदुमती रूप गुण संपन्न होती. तिच्या स्वयंवरासाठी राजा भोजाने रघुमहाराजांना आमंत्रण पाठविले. त्यांनी अजाला स्वयंवरासाठी विदर्भ देशात पाठवले. तेथे मगध, अंग, अवन्ती, कार्तवीर्य अर्जुन इ. राजे आले होते. पण इंदुमतीने सर्वगुणसंपन्न अजालाच वरले. विवाह संपन्न झाला. विवाहानंतर अज स्वतःच्या नगरीकडे निघाला असता काही राजांनी वाटेत त्याच्याशी युद्ध केले. पण त्यांना हरवून तो अयोध्येत परत आला. रघुने अजाच्या पराक्रमाची प्रशंसा केली. त्यानंतर त्याचा राज्याभिषेक केला. अजानेही प्रजेचे पुत्रवत् रक्षण केले. रघुराजाने यथावकाश वानप्रस्थाश्रम स्वीकारून मोक्षप्राप्ती केली. त्यानंतर काही काळाने अज आणि इंदुमती यांच्या पोटी पुत्ररत्न जन्मले. त्याचे नाव ‘दशरथ’ होय. इंदुमती ही एक शापित अप्सरा होती. तिला पूर्वी कोणीतरी शाप दिला होता. एकदा अज तिच्याबरोबर उद्यानात गेला असता तिच्या अंगावर फुलांचा हार पडला. ती तत्काळ मरण पावली. ती शापमुक्त झाली. तिच्या विरहाने अज अत्यंत दुःखी झाला. आचार्य वसि÷ांनी त्याला शोक आवरण्यासाठी उपदेश केला. तरीही त्यांचे दुःख शांत झाले नाही. इतके त्याचे इंदुमतीवर निरतिशय प्रेम होते. दुःखग्रस्त अजाने त्याच परिस्थितीत काही काळ राज्याचे रक्षण केले. शेवटी विरहाने दुःख व्याकूळ झालेल्या अजाने गंगेच्या संगमात देहत्याग केला. त्यानंतर अर्थातच अजपुत्र ‘दशरथ’ राजसिंहासनावर बसला व अयोध्येचा राजा झाला. अनेक गुणांचा समुच्चय असणारे राजे रघुवंशात होऊन गेले. म्हणूनच एक कवी म्हणतो,
गुणेषु क्रियतां यत्नः किमाटोपैः प्रयोजनम्।
विक्रीयन्ते न घण्टाभिर्गावः क्षीरविवर्जिताः।।
जगात गुणांचा सन्मान होतो. म्हणून ते आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाहेरच्या अवडंबरांचा काही उपयोग नाही. जसे दूध न देणाऱया गाई गळय़ात कितीही सुंदर घंटा बांधली तरी विकल्या जात नाहीत.