विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी/ सांगे
ऊस उत्पादक शेतकऱयांच्या धरणे आंदोलनाला मंगळवारी चार दिवस पूर्ण झाले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मंगळवारी सांगेला भेट देऊन सदर शेतकऱयांना पाठिंबा दिला. येत्या अधिवेशनात संजीवनी साखर कारखाना व ऊस उत्पादक शेतकऱयांसंदर्भात प्रश्न विचारले जातील आणि कारखाना लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येईल, असे कामत यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.
गेल्या विधानसभा अधिवेशनात यावर चर्चा करताना सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी कोणत्याही परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱयांवर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर बऱयाच शेतकऱयांचा ऊस तोडणीविना मळय़ातच राहिला. शेतकरी हा या देशाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याकडे सरकारने दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ते म्हणाले.
नुकसान सोसून कारखाना चालू करावा
आज दिल्लीत व अन्य राज्यांत दोन ते तीन लाख शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांना भीती आहे की, मोठे उद्योजक स्वस्तात माल घेणार आणि त्यामुळे शेतकरी संपणार. प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री असताना दोन वेळा संजीवनी नफ्यात आली होती. शेतकऱयांच्या हितासाठी जर काही प्रमाणात नुकसान सोसावे लागत असेल, तर ते सोसून सरकारने कारखाना चालू करावा, असे कामत म्हणाले. राणे यांनी कदंब महामंडळ सुरू केले होते. आजही ते नुकसानात चालते. पण खेडय़ापाडय़ातील गरजवंतांना ते सेवा पुरवत आहे. तसेच राज्यातल्या सामान्य व कष्टकरी शेतकऱयांच्या हितासाठी संजीवनी साखर कारखाना चालला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेतकऱयांच्या मागण्या रास्त
आंदोलक शेतकऱयांच्या मागण्या मोठय़ा नसून त्या रास्त वाटतात. या मागण्यांवर सरकार आणि समितीमध्ये चर्चाही करण्याची गरज वाटत नाही. संजीवनी कारखान्याच्या प्रशासकाला सांगे उपजिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून प्रश्नांची सोडवणूक करता येते. गेल्या तीन-चार वर्षांत ऊसाचे पीक घटल्याने शेतकरी दहा वर्षांची सरासरी मागत आहेत. उपजिल्हाधिकाऱयांनी सरकारकडे बोलून समन्वय साधावा, अशी सूचना त्यांनी केली.
लोकभावनेची सरकारकडून कदर हवी
शेतकऱयांचा संघटितपणा महत्त्वाचा असून एकसंध राहिल्याने प्रश्न सुटण्यास मदत होते, असे सांगून कामत यांनी त्यांचे कौतुक केले. जे लोकांना नको ते सरकारला नको ही भावना असली पाहिजे. आपण मुख्यमंत्री असताना लोकांनी विरोध केल्याने सेझ रद्द केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारने शेतकऱयांसाठी कार्य करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सदर आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
यावेळी आमदार प्रसाद गावकर, काँग्रेसच्या किसान विभागाचे अध्यक्ष अभिजित देसाई, सांगेचे माजी नगराध्यक्ष संजय रायकर, भाटीचे सरपंच उदय नाईक आदी हजर होते. मंगळवारी माजी मंत्री प्रकाश वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो व अन्य मान्यवरांनी भेटी दिल्या. सकाळपासून समझोता धडवून आणण्यासाठी प्रयत्न चालू होते. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची आंदोलनाच्या प्रमुखांशी बोलणी चालूच होती. काही तरी तोडगा निघेल असे वाटत होते.