प्रतिनिधी /वाळपई
आजच्या तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवायचा असेल तर त्यांना अध्यात्माची गोडी लावणे अत्यंत गरजेचे आहे. अध्यात्माच्या माध्यमातून आपण समाजाच्या विकासाचा रथ पुढे नेऊ शकतो भजन कीर्तन ही ईश्वराकडे संवाद साधण्याची सोपी व साधी भाषा आहे .यामुळे तरुणांनी अध्यात्माची कास धरावी व आपल्या जीवनाला एक वेगळय़ाच प्रकारचा आनंद निर्माण करून घ्यावा असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे. केरी सत्तरी येथील शंकरनाथ साप्रदायाच्या नवीन बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अनंत चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हा सोहळा नेत्रदीपक पद्धतीने संपन्न झाला.
धार्मिक उपक्रम व सांस्कृतिक सादरीकरण यामुळे हा सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला. राज्याच्या वेगवेगळय़ा भागातून मोठय़ा प्रमाणात भक्तगण या सोहळय़ाचे साक्षीदार बनले होते. लाखो रुपये खर्चून या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून या मठसांप्रदायाचा वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सभामंडपाची गरज होती. समाजातील दानशूर व्यक्तीने यासाठी विशेष योगदान दिले. खासकरून गोवा राज्याचे मंत्री मायकल लोबो यांचे विशेष सहकार्य आहे.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात आरोग्यमंत्री विश्वजित राणे केरी जिल्हा पंचायत सभासद देवयानी गावस, केरी पंचायतीचे सरपंच दाऊद सय्यद मठाचे पीठाधीश सद्गुरु चंद्रकांत गावस संप्रदायाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा होंडा जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर ,सचिव कृष्णा गवस गोवा पर्यटन महामंडळाचे सरव्यवस्थापक दीपक नार्वेकर
पंचायत सभासद लक्ष्मण गावस, संप्रदायाच्या समितीचे उपाध्यक्ष दत्ताराम शेटकर, खजिनदार महादेव गावकर सामाजिक कार्यकर्ते गजानन गावास व इतरांची खास उपस्थिती होती.
या संप्रदायाशी आज हजारोंच्या संख्येने भक्त जोडले गेले आहेत. यामुळे या ठिकाणी सुबक मंदिरांची उभारणी करणे गरजेचे आहे .या सुबक मंदिराची उभारणी आपण स्वतः करणार असून नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आपले वडील तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा होणार असल्याचे यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घोषित केले. यावेळी उपस्थित भक्तगणांनी टाळय़ा वाजवून याला उत्साहात अनुमोदन दिले.
दीपक नार्वेकर यांनी यावेळी बोलताना शंकरनाथ मठसंप्रदायाचा कार्य केरी भागातील प्रत्येक माणसाच्या सुखदुःखाशी समरस झालेली आहे. समाज सुसंस्कृत व सुशिक्षित व्हावा यासाठी या संप्रदायाने आतापर्यंत चांगल्या प्रकारचे योगदान दिलेले आहे. भागासाठी हा संप्रदाय विकासाचा महामेरू असल्याचे उद्गार यावेळी काढले. या मठाच्या माध्यमातून आज वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये अनेक मंडळी चांगल्या प्रकारे कार्य करीत असल्याचे यावेळी ते म्हणाले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सगुण वाडकर यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्याचा सविस्तरपणे आढावा घेतला व या संप्रदायाच्या माध्यमातून देण्यात येणारे वेगवेगळय़ा प्रकारचे उपक्रम या संदर्भात सविस्तरपणे माहिती दिली.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्याचा अहवाल समितीचे सचिव कृष्णा गावस यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन गावस यांनी केले.