ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले असून, अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटली नाही.
अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने या भागाला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. वेढा घट्ट होताच लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यावेळी सुरक्षा दलाने गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
तत्पूर्वी, 6 मे रोजी शोपियां जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. यावेळी एका दहशतवाद्याने शरणागतीही पत्करली होती.