तलावात ड्रेनेजचेच पाणी : शेतकरी-जनता हैराण
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ, मरगाई मंदिर येथे बांधण्यात आलेल्या सरकारी स्वच्छतागृहातून दररोज हजारो लीटर ड्रेनेजचे पाणी गटारीत सोडले जात आहे. ते पाणी गटारीतून वाहत असल्यामुळे मारुती गल्ली, लोहार गल्ली कॉर्नर परिसरातील रहिवाशांना जीवन जगणे अवघड बनले आहे.
अनगोळ, मारुती गल्ली, मरगाई गल्ली, लोहार गल्ली हा संपूर्ण भाग सखल आहे. त्यामुळे भाग्यनगर, विद्यानगर, चिदंबरनगर, अनगोळ मुख्य रोड, इंदिरानगर, शिवशक्तीनगर, चन्नम्मानगर तसेच गावातील डेनेजचे पाणी या गटारीतून अनगोळ शिवारातून डेनेज पाईपमधून सोडण्यात येत आहे. पण अनगोळ व इतर भागातून येणारा पाण्याचा लोंढा अधिक असल्यामुळे मारुती गल्ली परिसरात समस्या निर्माण झाली आहे.
कारण मारुती गल्ली भागातील डेनेज पाईप लहान असल्याने चेंबर भरून पाणी बाहेर पडत आहे. डेनेज चेंबर व पाईप कचऱयाने भरल्यामुळे समस्या निर्माण होत असून नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. चेंबरमधील पाणी गटारीतून वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. सदर गटारीचे डेनेजमिश्रीत पाणी काळय़ा तलावाला जाऊन मिळत आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल या कडक उन्हाळय़ाच्या महिन्यांमध्येही हा तलाव तुडुंब भरला आहे. या तलावात डेनेजचे पाणी असल्यामुळे तलाव परिसरातही दुर्गंधी पसरली आहे. तलावातील गाळ काढण्यात येत आहे. सुशोभिकरण करण्यात येत आहे. पण हे काम अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे. तलावातील जलपर्णी काढण्यात आली होती. पण ती जलपर्णी पुन्हा वाढली आहे. तलाव परिसरातील असलेल्या घरांना मात्र त्याचा मोठा फटका बसत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणात त्रास
उन्हाळय़ात या तलावाच्या पाण्यावर शेतकरी अवलंबून असतात. मात्र, डेनेजमिश्रीत पाणी असल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. हेच पाणी शिवारामध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. शेतकऱयांना तसेच महिलांना काम करताना समस्या निर्माण होत आहे. काही शेतकरी पिकांना हे पाणी सोडत आहेत. तेव्हा महानगरपालिकेने लक्ष देऊन तलावामध्ये जाणारे डेनेजचे पाणी थांबवावे, अशी मागणी होत आहे.