घरात कोंडल्या गेलेल्या आणि गळा आवळलेल्या उद्योगाना आता लॉकडाऊन 5 मध्ये अनलॉक करायचे धोरण ठरवण्यात आले आहे. हळूहळू सारे पूर्वपदावर येणार असे चित्र दिसत असले तरी कोरोनाचे संकट संपलेले नाही. ओघानेच मोकळीक मिळत असली तरी किती घ्यायची जे ज्याचे त्याने ठरवावे. तथापि ठप्प झालेले जीवन, कुलूपबंद उद्योग व्यवसाय आणि स्थलांतर या मुद्यावर सरकार काम करीत आहे याचे दर्शन झाले आहे. अनलॉकचा तोच अर्थ आहे. तो समजून घेतला पाहिजे. उमजून राबवला पाहिजे आणि योग्य ती दक्षता घेत कोरोना संकटावर मात केली पाहिजे. 25 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिला लॉकडाऊन जाहीर केला आणि भारतच नव्हे अवघे जग ठप्प झाले. त्यानंतर एक दोन, तीन चार करत चौथे लॉकडाऊन 31 मे ला संपले. लॉकडाऊन मधून हळूहळू काही गोष्टी वगळण्यात आल्या. तथापि, कोरोना दहशत कायम राहिली. आजही ती नष्ट झालेली नाही. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आणि कोरोना बळींची संख्या तोंडचे पाणी पळवत आहे. अवघ्या जगाची झोप उडली आहे. कोरोनावर परिणामकारक खात्रीचे औषध वा लस अजून सिद्ध झालेली नाही. आणि कोरोनासोबत जगायला शिका हे आता धोरण बनले आहे. याचा परिणाम ठप्प झालेल्या जीवनात आणि रूतून बसलेल्या अर्थचक्राला पुन्हा गती येणार आहे. औषध दुकाने, दवाखाने सुरू होते पण, आता अन्य दुकाने, बाजारपेठ सुरू झाली. कारखाने कार्यरत झाले. जिल्हांतर्गत वाहतूक सुरू झाली. रिक्षा सुरू झाल्या, कुरियर सेवा सुरू झाली. खरेदी विक्री व्यवहार होऊ लागले. दारू दुकाने सुरू झाली. पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे सुरू झाले. काही मार्गावर बसेस धावल्या. परप्रांतीय मजूर आपापल्या गावी गेले. बँका सुरू होत्याच त्यांनीही गती घेतली. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 संचारबंदी होती. बार, हॉटेल, रेस्टॉरंट बंद होती. लॉज, थिएटर, चित्रपटगृहे, सभा, मेळावे बंद होते. शाळा, क्लास, शिकवण्या परीक्षा बंद होत्या. आता जेथे कंटेन्मेंट झोन नाही तेथे हळूहळू हे सारे अनलॉक होणार आहे. अनलॉक एक, दोन, तीन असे त्यांचे टप्पे असतील. जनतेने योग्य वर्तन ठेऊन पुरेशी काळजी घेतली, स्वच्छता व नियम पाळले तर भारत कोरोनावर मात करेल असा सरकारला विश्वास आला असावा. तो सार्थ ठरवणे आणि मनावर ब्रेक ठेऊन सोशल डिस्टन्स, मास्क, स्वच्छता नियम या सर्वांचे पालन करत आपण आत्मनिर्भर भारतच्या दिशेने स्वदेशीचा मंत्र जागवत योग्य आचरण ठेवले तर विजयी होऊ शकतो. जगात भारी होऊ शकतो. एकाअर्थी आता चेंडू जनतेच्या कोर्टात आला आहे. देशापुढे कोरोनाचे जसे संकट आहे तसे शेजाऱयांचेही संकट आहे. नेपाळ, चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये कुरापती सुरूच आहेत. केंद्र सरकारला त्या पातळीवरही लढावे लागते आहे. एकीकडे हे युद्ध सुरू असताना केंद्र सरकारने वर्षपूर्ती साधली आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत येऊन एक वर्ष झाले आहे. कोरोना संकट नसते तर गाजावाजा झाला असता. दिल्लीत मिठाई आणि लाडू वाटले गेले असते. रामजन्मभूमी मुक्तीचे आणि कलम 370 रद्दचे फटाके उडवले असते आणि मोदी 2 सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन केले गेले असते. आता कोरोनामुळे सारे संदर्भ बदललेले आहेत आणि भूमिकाही बदललेल्या आहेत. जीव वाचवणे, कोरोनावर मात करणे आणि या संकटातही संधी शोधून त्यावर स्वार होणे याला प्राधान्य देणे क्रमप्राप्त झाले आहे. दुर्दैवाने देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोना हॉटस्पॉट बनली आहे आणि मुंबई ठीक होत नाही तोवर महाराष्ट्र व देश ठीक होणार नाही. ओघानेच मुंबईवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. पण, ते झालेले नाही. आता कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जून पर्यंत राहणार आहे आणि अन्यत्र अनलॉक केले जाणार आहे. 8 जूननंतर हॉटेल, लॉज, बार, रेस्टॉरंट वाहतूक त्यानंतर शाळा, क्लासेस आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होईल. राज्यांतर्गत वाहतूक सुरू होईल. खरीप हंगामाला मोकळीक दिली आहे, त्याला गती दिली जाईल व जीवन पूर्वपदावर येईल. या दरम्यान कोरोनावर परिणामकारक औषध व लस यावी आणि अर्थव्यवस्थेला गती मिळावी अशी अपेक्षा आहे. तथापि, या संकटाने ज्या चांगल्या सवयी लागल्या त्यापुढे चालू ठेवल्या तर जीवन अधिक समृद्ध होईल. या काळात अनेकांची व्यसने सुटली. जंकफुड व बाहेरचे खाणे थांबले. वर्क फ्रॉम होम सुरू झाले. मानवतेची भावना प्रबळ झाली. स्वदेशीचे महत्त्व कळले. क्रिएटिव्ह गोष्टींना वेळ मिळाला. पर्यावरण रक्षण झाले. नद्या शुद्ध झाल्या. प्राणी पक्षी दिसू लागले. या चांगल्याची जपणूक करायला हवी. त्याचबरोबर कोरोनाचा फटका, तडाखा बसलेली जी कुटुंबे आहेत त्यांना पुन्हा उभा राहण्यास मदत करायला हवी. या निमित्ताने अनेक परप्रांतीय मजूर गावी गेले आहेत आणि महानगरातून लहानलहान गावात मजुरांचे स्थलांतर झाले आहे. आगामी काळात या मंडळींना स्थानिक पातळीवर रोजगार मिळायला हवा. अशी पावले टाकली तर शहरावरचा बोजा कमी होऊन लहान गावे समृद्ध होऊ शकतील. स्थानिक तरूणांनीही आपल्या गावातील उद्योग आपणस नोकरी न देता परप्रांंितयांना का नोकरी देतो याचा विचार केला पाहिजे. स्थानिक माणूस नोकरीत स्थिरावला की स्थानिक कामगार नेत्यांच्या हाती लागून मालकाला त्रास देऊ लागतो. यात्रा, जत्रा, माती, लग्न अशा दांडय़ा मारतो व जेथे दोन मजूर हवेत तेथे तीन मजूर ठेवावे लागतात. शिवाय वर्गणी, देणगी, धमकी वगैरे सुरू होते. म्हणून परप्रांतियांना पसंती दिली जाते हे सत्य समजून घेतले पाहिजे आणि त्यावर मार्ग काढला पाहिजे. कोरोना संकटात सर्वाधिक फटका श्रमिक व गरीब वर्गाला आणि मध्यम वर्गाला बसला आहे. पर्यटन, लॉज, मीडिया, लहान उद्योग यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाचा फटका अजून कसा, किती व कुणाला बसणार यांचा अंदाज नाही. तथापि, लॉकडाऊनला आता उतार पडला आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येणार आहे. अशावेळी आपली सर्वांची जबाबदारी अधिक वाढली आहे. एकमेकाना मदत केली पाहिजे. माणुसकी जपली पाहिजे. गरीब, श्रमिक व असहाय्य यांना मदतीचा हात देतानाच नियम, शिस्त व संयम पाळून अनलॉक यशस्वी केला पाहिजे. संकट दबा धरून कायम आहे. त्यावर हुशारीनेच मात करावी लागेल.
Previous Articleकाळ तर मोठा
Next Article सोलापुरात आज पुन्हा 5 बळी, 84 नवे रुग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.