दुसर्याने मागितल्यावर आपलं मत दिलं तर त्याची काही किंमत राहते. फुकटचा सल्ला कितीही मोलाचा असला तरी तो न मागता दिल्याने दुसर्याच्या लेखी ती त्यांच्या आयुष्यात केलेली ढवळाढवळच ठरते. पण हे भान फार कमी लोकांना येतं. स्त्रियांच्या बाबतीत तर ‘एखाद्याबद्दल काही वाटतं म्हणून बोलले हो…’ किंवा ‘आम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार?’ असा आविर्भाव अधिक असतो. त्यांना दुसर्यांबद्दल काही वाटतही असेल, त्यांचं चांगलं व्हावं हा हेतू असेलही पण काळ आणि वेळ पाहून सल्ला दिला नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही हे त्यांना कोण समजावणार?
सुशीलाबाईंचं लक्ष समोरच्या फाईलमध्ये कमी आणि सुजाता आणि रेश्मा आपापसात काय बोलताहेत याकडे अधिक होतं. रेश्मा सांगत होती, ‘या रोजच्या भांडणाला आणि तमाशाला मी अगदी कंटाळून गेलेय. घरी गेलं तेच वातावरण, मला तर कुठेतरी पळून जावंसं वाटतंय…’
तिच्या बोलण्याचा मागचा पुढचा संदर्भ न लक्षात घेता शीलाताईंनी धाडकन सांगून टाकलं, ‘तुम्ही आजकालच्या स्वतंत्र मुली ! कसं काय सहन करता गं? सरळ घटस्फोट घ्यायचा आणि मोकळं व्हायचं. आहे काय त्यात?’
रेश्मा त्यांच्याकडे आवाक होऊन पाहत राहिली. मग ती स्पष्टच बोलली,‘ माझं आणि नवर्याचं चांगलं पटतंय, माझ्या दीर आणि जावेबद्दल सांगतेय. तुम्हाला काय करायचंय त्यांच्या भांडणाशी? काय करायचं ते त्यांचं ते पाहून घेतील…’
आता मात्र शीलाताईंचा चेहरा पडला. त्यांनी पुन्हा आपलं तोंड उघडायचं नाही असं मनाशी ठरवलं. पण शीलाताईंसारख्या कितीतरी जणींचा हा निश्चय मनातच राहतो आणि एखाद्या विषयावर आपला अनाहूत सल्ला देण्यावाचून त्यांना चैन पडत नाही. त्यांच्या अशा फुकटच्या सल्ल्यामुळे घरातले, नातेवाईक, मित्रमंडळी सगळेच त्यांच्यापासून दोन हात लांब राहायला बघतात. आणि आपलं बोलणं कोणाला पटतच नाही म्हणून शीलाताईंसारख्या बायका मनातल्या मनात कुढतात. या सगळ्याचं मूळ आहे त्यांचा अनाहूत सल्ला.
कोणी आपलं मत विचारल्याशिवाय ते देऊ नये हा खरं तर एक चांगला संकेत आहे पण बर्याच जणांचा आपल्या मनावर किंवा जीभेवर ताबा राहत नाही. आपला अनुभव शेअर करण्याची त्यांना घाई असते. त्यातून सुरू होतात ते त्यांचे अनाहूत सल्ले. लोकांना त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावलेलं आवडत नाही. पण काहीजण न कळत सल्ला देण्याच्या निमित्ताने ही सीमारेषा अगदी सहज ओलांडतात आणि लोकांच्या ब्लॅकलिस्टमध्ये आपोआप जाऊन बसतात. यात स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे, हे खेदाने नमूद करावं लागतं.
प्रसंग कोणताही असो, आपण आपलं मत व्यक्त केलंच पाहिजे, असा काही जणींचा होरा असतो. विशेषतः घरात एखादं मंगलकार्य ठरलं किंवा स्थळं पाहणं सुरू झालं की आपलं मत देणं हा त्या महिला आपला हक्क समजतात. त्यात मुलगी नोकरी करणारी असावी की नसावी इथंपासून लग्नानंतर कुठे फिरायला जायचं अशा कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो. ज्याला सल्ला द्यायचा आहे ती व्यक्ती आपल्याला किती जवळची आहे? त्याला या सल्ल्याची गरज आहे की नाही? आपण त्या क्षेत्रातले तज्ञ आहोत का? असा कोणताही विचार त्यांच्या मनाला सल्ला देताना शिवत नाही. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत असे अनेक नमुने घरोघरी पहायला मिळायचे. त्यावेळी नात्याचा किंवा वयाचा मान राखून त्यांचे सल्ले मानले जायचे किंवा त्यांच्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जायचं. पण आता काळ बदलला. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्याचं महत्त्व कळू लागलं. अशा वेळी उगाचंच आपलं मत प्रदर्शित करून
समोरच्याने त्यावर काही प्रत्युत्तर दिलं तर अपमान का करून घ्यायचा?
प्रत्येक बाबतीत आपलं मत नोंदवणार्या व्यक्ती हळूहळू समाजातलं आपलं स्थान गमावून बसतात. त्यांचं बोलणं लोक
मनावर तरी घेत नाहीत किंवा सरळ त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांना एकाकी वाटणं, अपमानास्पद वाटणं वगैरे गोष्टी जाणवू लागतात. पण या सगळ्याला आपला स्वभावच कोठेतरी कारणीभूत आहे याची जाणीव होत नाही. उलट एखाद्याबद्दल मनात आकस निर्माण होतो किंवा आपण कोणालाच नको आहोत हा न्यूनगंड तरी निर्माण होतो. दोन्ही गोष्टी मानसिक आरोग्यासाठी घातकच आहेत. स्त्रियांच्या बाबतीत हा बदल त्यांच्या मोनोपॉझच्यावेळी प्रकर्षाने जाणवतो. त्या अधिक चिडचिडय़ा होतात आणि आपलं कोणी ऐकतच नाही म्हणून मनात कुढत बसतात. अर्थात त्याची मूळं त्यांच्या अशा स्वभावातही असू शकतात.
या स्वभावाला पायबंद घालायचा तर माणसाने स्थितप्रज्ञ व्हायला हवं. कोणी विचारल्यास अथवा माझ्या जीवनावर परिणाम होत असेल तरच मी एखाद्या गोष्टीत लक्ष घालेन अशी वृत्ती अंगी बाणवायला हवी. ते सहजसाध्य नाही पण अशक्यही नाही. समाजात आपला मान राखायचा असेल तर आपल्या अनाहुत सल्ल्यांना वेळीच आवर घालायला हवा नाही का?