नगरसेवक मयूर पाटील; प्रभाग १६ मधील नागरिकांचा मनपावर घागर मोर्चा
सांगली/प्रतिनिधी
नदी उशाला असूनही पाणी मिळत नाही. महापालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे, याबाबत देणेघेणे नाही. येत्या आठ दिवसात प्रभाग सोळामधील पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकारी, पदाधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा नगरसेवक मयूर पाटील यांनी दिला. पुरेसे पाणी मिळत नसल्याने हैराण झालेल्या प्रभाग सोळामधील नागरिकांनी पाटील यांच्या नेतृत्वात मंगळवारी महापालिकेवर घागर मोर्चा काढला. यावंळी पाणी पुरवठा अभियंता अप्पा हलकुडे यांना निवेदन देण्यात आले.
सांगली शहरातील मध्यवर्ती असलेल्या खण भागासह प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या दीड वर्षांपासून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अर्धातासही पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. पाणी पुरवठा विभागाकडून मात्र याची दखल घेतली जात नाही. अधिकारी व कर्मचारी नगरसेवकानांही जुमानत नसल्याचे चित्र आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी नगरसेवक मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापालिकेवर ‘घागर’ मोर्चा काढला. पुरेशा पाण्याची मागणी करत महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र निदर्शने केली.
नगरसेवक मयूर पाटील म्हणाले, गावठाण भाग असतानाही खणभागासह प्रभाग १६ मध्ये पाणी टंचाई आहे. नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. हिराबाग जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे. अर्धा तासही पाणी मिळत नाही. अनेकवेळा अशुद्ध पाणी पुरवठा होतो. तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. महापालिकेत सत्ता कोणाची आहे, याचे देणेघेणे नाही. येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडू. यावेळी प्रभाग सोळा मधील नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.