भिलवडी / वार्ताहर :
नुकत्याच जुलै २०२१ ला येऊन गेलेल्या महापुरामध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांचे शंभर टक्के पंचनामे करून सरसकट सानुग्रह अनुदान मिळावे तसेच २०१९ ला आलेल्या महापुरावेळी निश्चत केलेली पूररेषा ग्राहय धरून छोटे दुकानदार व बारा बलुतेदार त्यांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाचे निवेदन भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी पलुसचे तहसिलदार निवास ढाणे यांना दिले.
सांगली जिल्हातील पलूस तालुक्यातील पुराने बाधित गावे तुपारी दह्यारी,नागराळे,पुनदी,पुनदीवाडी, दुधोंडी, बुर्ली, आमणापूर, विठ्ठलवाडी, अनुगडेवाडी, धनगांव, माळवाडी, भिलवडी अंकलखोप, चोपडेवाडी, सुखवाडी, ब्रम्हनाळ, खटाव, सुर्यगांव, राडेवाडी,नागठाणे, या सर्व गावांचे २२ ते २६ जुलै दरम्यान आलेल्या महापूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी स्थलांतरित झालेल्या लोकांचे मोठ्या प्रमाणात प्रापंचिक व आर्थिक नुकसान झाले आहे.
महापूर येऊन आठ दिवस झाले तरी अजून शासनाकडून कोणतीही ठोस मदत जाहीर करण्यात आलेली नाही. या उलट शासन वेळ काढूपणा करीत आहे असे दिसून येत आहे. २०१९ ला आलेल्या महापूराच्या संकटातून येथील शेतकरी कसाबसा सावरत आहे तोच आता आलेला महापूर म्हणजे कृष्णा काठावरील लोकांच्यावर आलेले आसमानी संकटच आहे.नुकत्याच आलेल्या महापूराची दाहकता २०१९च्या महापुरा प्रमाणेच आहे. त्यामुळे २०१९ च्या पुरावेळी लावण्यात आलेल्या निकषानुसार सदर महापुरग्रस्त गावे शंभर टक्के पुरबाधीत घोषित करून, सानुग्रह अनुदान व शेतीचे पंचनामे सरसकट करावेत अशी मागणी पुरग्रस्त भागातील भाजप नेते व कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे.त्याबाबतचे लेखी निवेदन पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांना दिले असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अंकलखोप येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.