विविध मागण्यांसाठी बेरड-रामोशी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
प्रतिनिधी/मिरज
ओबीसी आरक्षण, जातीचा दाखला आणि बेरड रामोशी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासह विविध मागण्यांसाठी आज, सोमवारी बेरड-रामोशी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
बेरड रामोशी समाजाला क्रांतीचा इतिहास आहे. याच समाजाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे समाजाच्या मागण्या १५ दिवसात पूर्ण न झाल्यास राज्यभर आंदोलन करून सत्ताधारी महाविकास आघाडी शासनाला इंग्रजांप्रमाणे सळो की पळो करून सोडू, असा इशारा यावेळी दौलतनाना शिंदे यांनी दिला. या मोर्चात बेरड रामोशी समाजातील हजारो बांधव सहभागी झाले होते. हातात पिवळे झेंडे घेऊन सहभागी झालेल्या समाज बांधवांमुळे सांगली-मिरज रस्त्यावर पिवळे वादळ निर्माण झाले होते. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
बेरड रामोशी समाज बांधवांनी पायी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यलयाच्या प्रवेश द्वारासमोर ठिय्या मारला. यावेळी बेरड समाजाचे नेते दौलतनाना शितोळे म्हणाले, बेरड समाजाला क्रांती घडविण्याचा इतिहास आहे. पण आज राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे समाजाची अवस्था बिकट झाली आहे. तरुणांना चांगले शिक्षण मिळत नाही, नोकऱ्या नाहीत. जातीचे दाखले मिळत नाहीत. रहायला घरे नाहीत. असे असताना बेरड समाजाचा केवळ मतांसाठी वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेरड रामोशी समाज आपल्या न्याय मागण्यासाठी आता रस्त्यावर उतरला असून शासनाला आमच्या मागण्यांची दाखल घ्यावीच लागेल.
समाजातील मुलांना शैक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे, ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, शंभर कोटी रुपयांच्या आर्थिक विकास महामंडळाची स्वतंत्र अंमलबजावणी करावी, गायरान जागेवरील घराचे नियमितीकरण करावे, हक्काची घरे द्यावीत, जातीच्या दाखल्यासाठी असणाऱ्या जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या.