प्रतिनिधी /बेंगळूर
अन्य खात्यांमध्ये नियुक्त झालेल्या पशूसंगोपन खात्यातील कर्मचाऱयांना 31 जुलैपर्यंत पुन्हा मूळ खात्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पशूसंगोपन मंत्री प्रभू चौहान यांनी दिली आहे.
पशूसंगोपन खात्याने शेतकरी, पशूपालकांच्या कल्याणासाठी प्राणी कल्याण मंडळ, पशूसंजीवनी, गोहत्या बंदी, जिल्हय़ात एक गोशाळा आणि 24 तास सेवा बजावणाऱया प्राणी कल्याण हेल्पलाईन यासारख्या लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी केली आहे. येथे काम करणाऱया कर्मचाऱयांची अन्यत्र नेमणूक करण्यात आल्यामुळे पशूसंगोपन खात्यामध्ये कर्मचाऱयांची कमतरता भासत आहे. राज्यातील विविध भागातून शेतकऱयांचे येणारे फोन आणि त्यांना उत्तर देणे कठीण झाले आहे. शिवाय जनावरांना लसी देण्याचे अभियान मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशूसंगोपन खात्यातून विविध कारणांमुळे वन खाते, पशूवैद्यकीय महाविद्यालये, पशूआरोग्य आणि जैविक संस्था, बेंगळूर महापालिका व पशूपालन खात्याच्या अंतर्गत येणाऱया निगम/मंडळांमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱयांना या महिन्याच्या अखेरपर्यंत मूळ खात्यामध्ये परतण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे ते म्हणाले.