भावाचे अपहरण झाल्याची बहिणीची तक्रार
प्रतिनिधी/ सातारा
अपघात घडल्यानंतर झालेल्या वादातून राजाळे, ता. फलटण येथील एकाला जीवे मारण्याची धमकी देत त्याला जबरदस्तीने ओमनी रुग्णवाहिकेत घालून त्याचे अपहरण केल्याची घटना फलटण येथे घडली आहे. याप्रकरणी संग्राम गोविंद घनवट (रा. फरांदवाडी, ता. फलटण) याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार निलम सचिन सोनवलकर (वय 34, रा. वडले, ता. फलटण) यांचा भाऊ राहूल श्रीरंग शिंगाडे वय 35, रा. राजाळे, ता. फलटण यांचा संग्राम गोविंद घनवट (रा. फरांदवाडी, ता. फलटण) यांच्याबरोबर अपघाताच्या कारणातून वाद झाला होता. दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजता राहूल शिंगाडे हे फलटणमधील स्पंदन हॉस्पिटल परिसरात होते. त्यावेळी संग्राम घनवट याने शिंगाडे यांना जीवे मारण्याची धमकी देवून ओमणी रुग्णवाहिकेत जबरदस्तीने बसवले व त्यांना घेवून पुण्याच्या दिशेने घेवून जात त्यांचे अपहरण केले आहे.
याबाबत शिंगाडे यांची बहीण निलम सोनलवकर यांच्या तक्रारीनंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात संग्राम घनवटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बोडरे करत आहेत.