ऑनलाईन टीम / पुणे :
‘रस्त्यांची बांधणी आणि सुधारणा याबाबत भारत जगातील दुसरा देश बनला आहे, मात्र अपघात आणि प्रदूषण वाढत आहे. हे रोखणे प्रत्येकाच्या हातात असून त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे’, असे प्रतिपादन सह प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले.
ए के के न्यू लॉ अकॅडमी, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय आणि रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या वतीने राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिन्यानिमित्त आयोजित वेबिनार मध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार अध्यक्ष स्थानी होत्या .
संजय ससाणे म्हणाले, दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची संख्या वाढत आहे .त्याचबरोबर अपघातांची संख्याही वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीने वाहन चालविताना खबरदारी घेतली पाहिजे . रस्त्यांच्या सुधारणांवर आपण लक्ष केंद्रित केले आहे,त्यामुळे आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत.
अपघात आणि प्रदूषण वाढत आहे . हे रोखणे प्रत्येकाच्या हातात असून त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. मद्यपान करून गाडी चालविणे, वेगाने गाडी चालविणे, घरगुती किंवा अन्य समस्यांचा विचार करीत गाडी चालविणे टाळले पाहिजे .
आबेदा इनामदार म्हणाल्या, वाहतूक विषयक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. युवा पिढी देशाचे भवितव्य असल्याने त्यांनी वाहने चालविताना जबाबदारीने चालविली पाहिजेत. याबाबत जनजागृती करणे हे फक्त वाहतूक विभागाचे किंवा स्वयंसेवी संस्थांचे काम नसून सर्वानी त्यासाठी योगदान दिले पाहिजे’.