पंतप्रधान मोदी यांचे उद्गार, ‘परीक्षा पे चर्चा’तून साधला विद्यार्थ्यांशी संवाद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘परीक्षा हे जीवन नसून जीवनातील एक टप्पा आहे. परीक्षेत यश मिळविण्याची अपेक्षा प्रत्येकाची असते. पण ती पूर्ण झाली नाही तरी खचून जाता कामा नये. कारण अपयशातून अनेकदा नव्या संधी गवसतात. अपयश याचा अर्थ अद्याप आपल्यातील सर्व क्षमता दृगोचर झालेल्या नाहीत, असा होतो’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. सोमवारी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांवरून देशभरात करण्यात आले. विद्यार्थ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हा कार्यक्रम आधी चित्रीत करून नंतर प्रसारित करण्यात आला नव्हता. कोणतीही काटछाट न करता तो प्रत्यक्ष प्रसारित करण्यात आला. मोदींनीच तसा आग्रह धरला होता. सध्याचे युग गोपनीयतेच्या विरोधात आहे. ‘विदाऊट फिल्टर’ हा सांप्रतच्या काळाचा मंत्र आहे, अशा उद्गारांनीच त्यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केला. अभ्यास, परीक्षा आणि अभ्यासेतर क्रियाकलाप यावर त्यांनी भर दिला.
हा कार्यक्रम सर्वात प्रिय
आपल्या कोणत्याही कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम सर्वात प्रिय आहे. आतापर्यंत असे चार कार्यक्रम केले आहेत. या कार्यक्रमातून जितके समाधान मिळते तितके इतर कोणत्याही कार्यक्रमातून मिळत नाही. देशाच्या भविष्याचे दर्शन विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर आपल्याला घेता येते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अभ्यासेतर क्रियाकलाप हवेतच, पण…
विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यास एक्के अभ्यास असे करून चालणार नाही. त्याव्यतिरिक्त क्रियाकलाप (ऍक्टिव्हिटीज) हवेतच. तथापि, त्यांचाही अतिरेक नको. शिवाय हे क्रियाकलाप केवळ प्रसिद्धीसाठी किंवा ग्लॅमरसाठी नकोत. या क्रियाकलापांमधून आपल्या मूळ ध्येयाला साहाय्य झाले पाहिजे. अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांपेक्षा आईवडिलांनाच आपल्या पाल्याने अशा क्रियाकलापांमध्ये जास्तीत जस्त लक्ष घालावे असे वाटत असते. आपल्या पाल्याचा दिवसभराचा कार्यक्रम भरगच्च असावा. त्याने अभ्यास, शाळा, शिकवण्या, खेळ, नृत्य, कला आदी सर्वच क्षेत्रात सरस कामगिरी करावी. त्यांचे प्रशिक्षक घ्यावे, असे त्यांना वाटते. तथापि, आपल्या पाल्याचा नेमका कल कोठे आहे आणि त्याला नेमके काय जमू शकेल याचा विचार केला जात नाही. इतर मुले जे करतात तेच आपल्या मुलांनी करावे असा आईवडिलांचा हेका असतो. हे टाळले पाहिजे अशी सूचना त्यांनी केली.
पॅशन ही फॅशन होऊ नये
विद्यार्थ्यांना एकादे ध्येय साध्य करण्याची आस (पॅशन) असते. मात्र या पॅशनची फॅशन होऊ नये. केवळ दिखाऊपणा करण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यातून काही साध्य होणार नाही, याची जाणीव सदैव ठेवणे आवश्यक आहे. आपल्या अभ्यासातून थोडा का असेना पण वेळ इतर क्रियाकलापांसाठी राखून ठेवावा. असे केल्याने मुख्य ध्येयाच्या वाटचालीवर आपल्या उत्साह टिकून राहतो. अभ्यासेतर क्रियाकलापांमुळे मन व शरीर ताजेतवाने राहते, असा अनुभव त्यांनी कथन केला.