‘अम्फान’ चक्री वादळ : कोलकाता विमानतळ पाण्याखाली
ऑनलाईन टीम / कोलकाता :
कोरोना नंतर आलेल्या ‘अम्फान’ चक्री वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. या चक्री वादळाने पश्चिम बंगाल ची राजधानी कोलकातालाही तडाखा दिला. ताशी 120 किलोमीटर वाऱ्याचा वेग होता. कोलकाता मधील अनेक भागात पूर आला असून कोलकाता विमानतळ देखील पाण्याखाली गेले आहे. यामध्ये कोलकाता विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर सर्वत्र पाणी साचले आहे. रनवे, हँगर्स पाण्यात बुडाले आहेत. विमानतळाचा एक भाग पूर्ण पाण्याखाली गेल्याने विमानतळावरील सर्व कामकाज देखील बंद झाले आहे. तसेच विमानतळावर पाणी साचल्याने विमान तळावर उभी असलेली विमाने समुद्रात तरंगत असल्यासारखी दिसत होती. तर 40 टन पेक्षा अधिक वजनाची विमाने देखील वादळामुळे हलत होती.
दरम्यान, कोलकाता विमान तळावरील प्रवासी उड्डाणे 25 मार्च पासून बंदच आहेत. वंदे भारत मिशनला जाण्यासाठी फक्त मालवाहतूक आणि उड्डाणे सुरू होती. त्यांना ही आता थांबवण्यात आले आहे. बंगाल मधील समुद्र किनाऱ्याला धडकत देताना अम्फान चक्री वादळाची गती ताशी 180 पेक्षा अधिक होती.
या वादळामुळे बंगालमधील कमीत कमी 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ओडिशातील 3 जण ठार झाल्याची माहिती आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही राज्यात मदत व बचाव कार्य सुरू आहे.