बेळगाव : /प्रतिनिधी :
अनलॉक चारला सुरुवात झाल्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने परिवहनला दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊननंतरच्या काळात परिवहनची बससेवा तोटय़ातच सुरू होती. गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने परिवहनला दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊन काळात परिवहनचे उत्पन्न शुन्यावर आल्याने परिवहन अडचणीत आले आहे. मात्र, आता उत्पन्नात वाढ होत असल्याने परिवहनच्या चाकांना गती मिळाली आहे.
लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता वाढविण्यात आल्यानंतर राज्यांतर्गत बससेवा सुरू झाली होती. दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद थंडाच होता. त्यामुळे परिवहनला दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. दरम्यान बसचालक, बसवाहकांना प्रवाशांच्या प्रतीक्षेत बसावे लागत होते. मात्र, आता प्रवाशांच्या प्रतिसाद वाढत असल्याने परिवहन रूळावर येताना दिसून येत आहे.
लॉकडाऊन काळात सर्वसामान्य प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्नाचा स्रोत थांबला. त्यामुळे परिवहनच्या कर्मचाऱयांना वेतन मिळणेही कठीण झाले. अन्य कामांवरही परिणाम झाला. दरम्यान, राज्य सरकारने कर्मचाऱयांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी 50 टक्के रक्कम दिली होती. मात्र अद्याप महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा सुरू न झाल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे. राज्यात जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात हळूहळू वाढ होत असली तरी निर्धारित उत्पन्न उद्दिष्टांपासून परिवहन अद्याप दूरच आहे.
लॉकडाऊनआधी बेळगाव आगारातून 693 बसगाडय़ा धावत होत्या. लॉकडाऊन काळात हे प्रमाण फारच कमी झाले होते. सध्या आगारातून 583 बसगाडय़ा धावत आहेत. लॉकडाऊनआधी बेळगाव विभागातून दररोज सुमारे 75 ते 80 लाख रुपये उत्पन्न मिळत होते. लॉकडाऊनमध्ये बससेवा ठप्प झाली आणि उत्पन्नच थांबले. त्यानंतर टप्प्याटप्प्यात जिल्हांतर्गत आणि नुकतीच आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढलेली पाहायला मिळत आहे. बसस्थानकात स्थानिक प्रवाशांबरोबर लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱया वाढविण्यात येत आहेत.